पुणे शहराची सध्याची पाण्याची वार्षिक गरज सुमारे २० टीएमसी आहे. मात्र खडकवासला धरण साखळीतून महापालिकेला केवळ १४ टीएमसी पाणी मिळते. ही ६ टीएमसीची तूट भरून काढण्यासाठी मुळशी धरणाचे पाणी पूर्वेकडे वळवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांनी या वापरास तांत्रिक मान्यता दिली आहे.
advertisement
मुळशी धरणातून सध्या टाटा हायड्रो पॉवर कंपनीमार्फत वीजनिर्मिती केली जाते. अहवालानुसार, धरणातील २४ टीएमसी पाण्यापैकी पावसाळ्यातील तीन महिन्यांत उपलब्ध होणाऱ्या १७ टीएमसी पाण्याद्वारे वीजनिर्मिती होते. यातील बाष्पीभवन आणि इतर तांत्रिक बाबी वजा जाता, ७ टीएमसी पाणी वीजनिर्मितीवर परिणाम न करता पुण्याच्या दिशेला वळवणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे पाणी पुणेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जलसंपदा विभागाने दोन महत्त्वाचे मार्ग सुचवले आहेत:
१. थेट पाईपलाईन: पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएने स्वखर्चाने मुळशी प्रकल्पातून थेट पाईपलाईन टाकून हे पाणी उचलणे.
२. ३० किमीचा बोगदा: मुळशी धरण ते खडकवासला धरण यादरम्यान ३० किलोमीटर लांबीचा भुयारी बोगदा तयार करणे. जेणेकरून मुळशीचे पाणी थेट खडकवासला जलाशयात येईल आणि तेथून संपूर्ण शहराला पुरवता येईल.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांमार्फत हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सुपूर्द केला जाईल. सरकारची मोहोर उमटल्यानंतर या प्रकल्पाचा 'सविस्तर प्रकल्प अहवाल' (DPR) तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या निर्णयामुळे भविष्यात पुण्याचा पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार आहे.
