कर्वेनगर आणि शिवणे भागातील एका नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ आणि वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एका खासगी कंपनीच्या महिला संचालकाला धमकावून, गुंड नीलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन आणि त्यांच्या साथीदारांनी तब्बल ४४ लाख रुपयांची खंडणी उकळले होते. या प्रकरणी नीलेश घायवळसह एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या खंडणी प्रकरणात शाळेतील एका क्रीडा शिक्षकाचाही समावेश आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणात पसार असलेल्या नीलेश घायवळविरुद्ध आतापर्यंत एकूण दहा गुन्हे दाखल झाले आहेत.
advertisement
नेमकं काय घडलं?
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खासगी कंपनीच्या महिला संचालिकेने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, नीलेश घायवळ, बापू कदम, सचिन घायवळ यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार ४० वर्षीय महिला कर्वेनगर आणि शिवणे भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ आणि वाहतूक सुविधा पुरवठा करते. शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून काम करणाऱ्या आरोपी बापू कदम याच्याशी महिलेची ओळख झाली होती.
२०२४ मध्ये कदमने महिलेला सांगितले की, 'माझी डेअरी आहे, शाळेच्या उपाहारगृहात दूध आणि पनीर पुरवठा करण्याचे काम मला द्या.' कदमचा गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याची माहिती महिलेला होती. या कामासाठी महिलेने कदमच्या खात्यात वेळोवेळी २२ लाख पाठवले. पण कदमने दूध-पनीरचा पुरवठा केला नाही. जानेवारी २०२५ मध्ये महिलेने कदमला याबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने धमकी दिली. 'मी नीलेश घायवळ टोळीसाठी काम करतो आणि त्याचा भाऊ सचिन हा शाळेत क्रीडा शिक्षक आहे. तुम्हाला उपाहारगृहासाठी आमच्याकडूनच दूध-पनीर खरेदी करावे लागेल. नाहीतर तुमचा व्यवसाय बंद पाडू,' अशी धमकी त्याने दिली.
यानंतर महिला शाळेच्या परिसरातून कारमधून जात असताना, कदमने तिची कार अडवली. त्यावेळी दुसऱ्या कारमधून नीलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन आणि इतर साथीदार आले. सचिन घायवळ याने महिलेला 'तुम्हाला जिवंत राहायचे नाही का?' अशी धमकी दिली आणि तातडीने खात्यात पैसे जमा करायला सांगितले. घाबरून महिलेने पुन्हा २२ लाख रुपये बँक खात्यात जमा केले. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ही माहिती दिली असून, वारजे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.