पुणे जिल्हा परिषद ही राज्यातील सर्वांत मोठ्या आणि महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक आहे. ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी जिल्हा परिषदेवर असते. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर विराजमान होणाऱ्या नेतृत्वाकडे केवळ प्रशासकीय क्षमता नव्हे, तर राजकीय समतोल राखण्याचे कौशल्यही अपेक्षित असते. सध्या पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असून बहुमताच्या जोरावर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर आपलेच उमेदवार निवडून आणण्याचा पक्षाचा निर्धार आहे.
advertisement
सुनेत्रा पवार काय म्हणाले?
सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजितदादांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. अजितदादानी जी.स्वप्न पाहिली होती ती आपल्याला आता पूर्ण करायचे आहेत, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. गाव खेड्यातील बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपल्या सूचना आणि सल्ल्याचा आदर केला जाणार माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व सदस्यांशी समन्वय साधत पक्षांतर्गत बैठका, चर्चा आणि रणनीती आखली जात आहे. नेतृत्वाच्या निवडीबाबत अनुभव, सामाजिक समतोल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांकडूनही आपली भूमिका आक्रमकपणे घेण्याचे प्रयत्न सुरू असून संख्याबळ कमी असले तरी राजकीय दबाव वाढवण्यासाठी ते सज्ज असल्याचे दिसते.
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीचा मुहूर्त ठरला
पुणे जिल्हा परिषद ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर निवडून येणाऱ्या नेतृत्वाकडून विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी ठोस निर्णय घेतले जावेत, अशी जनतेची भावना आहे 18 मार्च रोजी होणारी ही निवडणूक केवळ पदांची निवड ठरवणारी नसून आगामी राजकीय समीकरणांची दिशा दर्शवणारी ठरणार आहे.
