एक्सप्रेसवेवरील कोंडीवर जालीम 'उतारा'
सध्या मराठवाडा आणि अहिल्यानगरहून मुंबईकडे जाणारी बहुतांश वाहतूक चाकण-तळेगावमार्गे लोणावळ्यातून एक्सप्रेसवेवर येते. यामुळे खंडाळा घाटात वाहनांचा प्रचंड भार वाढतो. मात्र, शिरूर-कर्जत हा नवा मार्ग तयार झाल्यामुळे मराठवाड्यातून येणारी जड वाहतूक शिरूर-खेड मार्गे थेट कर्जतला पोहोचेल. म्हणजेच, मुंबईला जाण्यासाठी लोणावळा घाटात न शिरता एक स्वतंत्र आणि जलद मार्ग उपलब्ध होईल.
advertisement
प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये:
हा रस्ता आधुनिक चारपदरी मल्टिमोडल कॉरिडॉर म्हणून विकसित केला जाणार असून त्याची लांबी १३५ किमी असेल. पहिल्या टप्प्यात ६० किमी आणि दुसऱ्या टप्प्यात ७५ किमीचे काम पूर्ण केले जाईल. या मार्गावर ५ बोगदे, ६ मोठे पूल आणि ४८ लहान पूल बांधले जाणार आहेत, ज्यामुळे प्रवास सुसाट होईल. या प्रकल्पासाठी सुमारे साडेबारा हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, तो 'बीओटी' (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) तत्त्वावर राबवला जाणार आहे.
औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा
चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर या औद्योगिक पट्ट्यातील जड वाहतुकीमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या अंतर्गत रस्त्यांवर होणारी कोंडी या नव्या मार्गामुळे ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. ६७० हेक्टर जमीन संपादनाचे काम वेगाने पूर्ण करून या प्रकल्पाला मुहूर्त मिळण्याची चिन्हे आहेत.
शिरूर-कर्जत महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'डेडलॉक' कायमचा फुटेल आणि प्रवाशांना 30 तास भयंकर कोंडीत अडकण्यासारख्या संकटातून मुक्ती मिळेल.
