ज्योतिषशास्त्र सांगतं की, आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या चांगल्या, वाईट घटनांचे संकेत कधीकधी आपल्याला कळत-नकळतपणे मिळतात. आपल्याला फक्त ते अचूक ओळखता यायला हवे इतकंच. अगदी जेवणातूनही आपल्याला काही संकेत मिळत असतात.
कधीकधी आपल्या जेवणात केस येतो, मग काहीजणांना पुढे जेवायला किळस वाटते, तर काहीजण तो केस बाजूला काढून व्यवस्थित जेवण करतात. ज्योतिषी सांगतात की, कधीतरी जेवणात केस आढळणं सामान्य आहे. परंतु जर सतत असं होत असेल तर हे अत्यंत अशुभ मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की, आपल्या घरावर किंवा आयुष्यावर राहूचा प्रभाव वाढलाय. राहू हा क्रूर ग्रहांपैकी एक मानला जातो. कारण तो अडचणी घेऊन येतो असं म्हणतात. ज्या व्यक्तीवर राहूचा प्रभाव वाढतो, तिच्या हातात पैसा काही केल्या टिकत नाही, अशी मान्यता आहे.
advertisement
'हा' असू शकतो पितृदोष!
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जेवायला बसलात आणि ताटात लगेच केस दिसला किंवा पहिल्याच घासात केस आला तर हा पितृदोषाचा संकेत असू शकतो. कदाचित आपल्या घरात किंवा पत्रिकेत पितृदोष निर्माण झालेला असू शकतो. जेवणात आलेला हा केस अडथळे दर्शवतो.
सतत हातातून जेवण निसटणं…
कधीकधी असं होतं की, आपण जेवण वाढत असताना अन्नपदार्थ हातातून निसटतात. हा शुभ संकेत नसतो. यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकतं. तसंच आरोग्यासंबंधी अडचणीही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जेवण बनवताना आणि वाढताना मन एकाग्र असायला हवं.
दरम्यान, कधीही जेवण बनवण्याआधी केस घट्ट बांधावे, जेणेकरून जेवणात केस येऊ नये. कारण जेवणात केस येणं आरोग्यासाठीही चांगलं नसतं. शिवाय राहूचा प्रभाव अत्यंत घातक असतो, त्यामुळे जर जेवणात केस आढळला तर पुढे ते जेवण करू नये. परंतु ते जेवण फेकूही नये, तर प्राणीमात्रांना चारावं, असा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
