पंचांगानुसार 2 मार्चच्या रात्री होळी पेटवली जाईल. संध्याकाळी 5:55 वाजल्यापासून भद्रकाळ सुरू होणार असून तो 3 मार्चच्या पहाटे 4:28 वाजेपर्यंत असेल. यंदा भद्रा पृथ्वीलोकात मानली जात असल्यामुळे प्रदोष काळात म्हणजे सांजवेळी होळीचं पूजन आणि दहन करणं सर्वात उत्तम ठरेल. या दिवशी गरजूंना दान देणं खूप पुण्याचं मानलं जातं.
होळी पेटवण्यापूर्वी तिची मनोभावे पूजा करावी. होळीला सुती धागा गुंडाळत 5 ते 7 वेळा प्रदक्षिणा घालाव्यात. होळीच्या अग्नीमध्ये नारळ, अक्षता आणि जवस अर्पण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. महाराष्ट्रात होळीला नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा मान असतो, त्यामुळे 'होळी रे होळी, पूर्णाची पोळी' असं म्हणत होळीला नैवेद्य दाखवून मगच ती पेटवली जाते.
advertisement
होळीच्या वेळी पांढऱ्या, पिवळ्या किंवा लाल रंगाचे साधे सुती कपडे घालणं शुभ मानलं जातं. या दिवशी चामड्याचे बेल्ट, पाकीट किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते असं मानलं जातं.
अनेक ठिकाणी होळी पेटवून लोक लगेच घरी परततात, पण तसं करू नये. होळीच्या अग्नीजवळ थोडा वेळ थांबून तिची ऊब घ्यावी. असं मानलं जातं की होळीच्या अग्नीत एक विशेष शक्ती असते, जी आपल्या शरीरातील आणि मनातील नकारात्मकता नष्ट करते. दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची राख (विभूती) घरी आणून ती कपाळाला लावणं आणि घराच्या कोपऱ्यात शिंपडणं वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं.
मेष, सिंहसहित 6 राशींना होळीपर्यंत गुडन्यूज; मंगळ कुंभ राशीतून भाग्यचक्र फिरवणार
होळीचा दिवस हा घरात शांती आणि समृद्धी मागण्याचा असतो. या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करणं पूर्णपणे टाळावं. तामसी अन्न घेतल्यामुळे धनहानी किंवा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात, असं जुने जाणकार सांगतात. त्यामुळे या दिवशी सात्विक आहार घेणं हितकारक असतं. नकारात्मक शक्तींचा प्रभाव टाळण्यासाठी महिलांनी होळीच्या पूजेच्या वेळी आपले केस मोकळे सोडू नयेत. केस व्यवस्थित बांधून पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, अशी धारणा आहे.
