व्रताचे महत्त्व काय?
शास्त्रांनुसार मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना धार्मिक कामांपासून दूर राहावे लागते. मात्र कधी नकळत पूजा केली जाते, देव्हाऱ्याला स्पर्श होतो किंवा धर्मकर्मात सहभाग होतो. अशा वेळी पाप लागते असे मानले जाते. त्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठीच ऋषी पंचमी व्रत पाळले जाते.
advertisement
ब्रह्मपुराणात स्पष्ट सांगितले आहे की सर्व वर्णातील स्त्रियांनी हे व्रत करावे. या व्रतामुळे स्त्रीच्या शरीरावर आणि मनावर आलेली अशुद्धी दूर होते. तसेच या व्रतामुळे आत्मशुद्धी, संयम आणि अध्यात्माशी नाते जुळते असे मानले जाते.
पूजा आणि विधी
या दिवशी सप्तर्षी वसिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, अत्री, जमदग्नी, गौतम आणि भारद्वाज तसेच अरुंधती देवी यांची पूजा केली जाते. सप्तर्षींनी समाजाला दिलेल्या ज्ञान, तपस्या आणि संस्कारांच्या स्मरणाने स्त्रियांना आध्यात्मिक बळ मिळते अशी श्रद्धा आहे. पूजेच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी मीठ खाऊ नये. नांगरलेल्या शेतातून मिळणारे धान्य, फळे आणि भाज्यांचा वापरही केला जात नाही. सहसा या दिवशी दही आणि देवभात खाण्याची परंपरा आहे.
ऋषी पंचमी हा दिवस केवळ धार्मिक विधी नसून स्त्रियांना शुचिर्भूत राहण्याचे आणि आत्मशुद्धी साधण्याचे स्मरण करून देणारा दिवस आहे. यातून स्त्रियांना संयम, शिस्त आणि धर्माची जाणीव राहते. समाजालाही स्त्रीच्या शुद्धतेचे आणि नियमपालनाचे महत्त्व समजते.





