चिन्नास्वामी स्टेडियमवर स्मारक
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांच्या स्मरणार्थ एका स्मारकाचं अनावरण करण्यात येणार आहे. स्टेडियमच्या आतील प्रवेशद्वारावर हा फलक लावला जाईल, तसंच ज्यांनी या चेंगराचेंगरीमध्ये प्राण गमावले त्या 11 जणांच्या स्मरणार्थ स्टेडियममधल्या 11 जागा कायमस्वरूपी राखीव ठेवल्या जातील. या जागा बंदिस्त करून आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी या जागांवरच्या तिकीटाची विक्री केली जाणार नाही. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी असं स्मारक बनवणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, पण जागा राखीव ठेवली जाणार का नाही? याबाबत त्यांनी आता काहीही उघड केलं नाही.
advertisement
'त्या भीषण दुर्घटनेचा विचार करणंही वेदनादायी आहे, पण आम्ही मागच्या काही काळापासून या स्मारकाबाबत चर्चा करत होतो. या 11 जणांच्या स्मृतीचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे. क्रिकेट चाहत्यांचं आयुष्य दुर्दैवाने अकाली संपले, पण त्यांच्या स्मरणार्थ एक स्मृतिलेख उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे', असं व्यंकटेश प्रसाद म्हणाला आहे.
मॅचआधी श्रद्धांजली
आयपीएलचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी बंगळुरूच्या स्टेडियममध्ये एक मिनिट मौन पाळून मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली दिली जाईल, तसंच मृत्यू झालेल्यांची नावंही स्टेडियममध्ये प्रदर्शित केली जाणार आहेत.
चिन्नास्वामीमध्ये मॉकड्रील
कर्नाटक सरकारकडून सुरक्षेच्या सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल सामने खेळवायला परवानगी देण्यात आली आहे. मैदानाची सुरक्षितता आणि तयारी किती आहे, हे पाहण्यासाठी मॉक ड्रीलचंही आयोजन करण्यात आलं होतं. आता गुरूवारी आणखी एका मोठ्या मॉक ड्रीलचं आयोजन केलं जाणार आहे. तर सामन्याच्या दिवशी 500 स्वयंसेवक स्टेडियममध्ये असतील.
कर्नाटक सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने मैदानाचा सखोल आढावा घेतल्यानंतर मागच्या आठवड्यात एम.चिन्नास्वामी स्टेडियमला आयपीएल सामन्यांचं आयोजन करण्याची मंजुरी देण्यात आली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आरसीबी त्यांच्या 7 पैकी 5 होम मॅच चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तर उरलेल्या 2 मॅच रायपूरमध्ये खेळणार आहे.
