दीपक चहरच्या पहिल्याच ओव्हरला राजस्थानने तब्बल 22 रन काढल्या. यानंतरही वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनी मुंबईच्या बॉलिंगवर आक्रमण सुरूच ठेवलं. यशस्वी जयस्वालने 32 बॉलमध्ये नाबाद 77 आणि वैभव सूर्यवंशीने 14 बॉलमध्ये 39 रनची वादळी खेळी केली.
राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईची सुरूवातही खराब झाली. रेयान रिकलटन, रोहित शर्मा हे ओपनर आणि तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव हे मीडल ऑर्डर बॅटर अपयशी ठरले. बॅटिंग ऑर्डर कोसळल्यानंतर मात्र मुंबई सामन्यातून पूर्णपणे बाहेर झाली.
advertisement
पराभवानंतर काय म्हणाला कॅप्टन पांड्या?
'पॉवर प्ले मध्ये आम्ही ज्या पद्धतीने बॉलिंग करायला पाहिजे होती, ज्या प्रकारे बॉल टाकायला पाहिजे होते, ते आम्ही टाकले नाहीत. त्यांनी चांगली बॅटिंग केली. आमच्या बॉलरना आता जबाबदारी घ्यावी लागेल. बॉलिंग ग्रुप म्हणून आम्ही अजिबात अपेक्षेप्रमाणे खेळलो नाही. मी या पराभवाचे खापर बॅटिंगवर फोडणार नाही. बॉलरनी जबाबदारी घ्यायला हवी होती', असं कठोर शब्द हार्दिक पांड्याने या पराभवानंतर वापरले आहेत.
'टी-20 क्रिकेटमध्ये दोन योग्य बॉल टाकणं महत्त्वाचं असतं. तुम्ही या सामन्याचा निकाल पाहिलात तर आम्ही 27 रननी हरलो आहोत, 5 चांगले बॉल आणि 5 कमी सिक्स गेल्या असत्या तर मॅचचा निकाल वेगळा असता. आम्ही योग्य बॉल टाकले असते तर आम्ही सामन्यात टिकून राहिलो असतो. त्यांच्या ओपनरनी काही ओव्हर वर्चस्व गाजवलं आणि आम्हाला सामन्यातून बाहेर फेकलं, त्यानंतर आम्ही पिछाडीवरच राहिलो. आम्ही या सामन्यात कमी पडलो', असं हार्दिक पांड्या म्हणाला आहे.
वैभवचंही कौतुक
हार्दिक पांड्याने वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगचंही कौतुक केलं आहे. 16-17 वर्षांच्या मुलाला अशाप्रकारे खेळताना पाहणं खूपच आकर्षक आहे. सामन्याच्या तयारीवेळीही त्याच्याबद्दल इतकी चर्चा झाली. त्याचा निर्भयपणा आणि शॉट पाहणं खूपच अद्भुत आहे. मी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्याने दिली.
