राजस्थानच्या टीममध्ये यशस्वी जयस्वाल असतानाही रियान परागला कॅप्टन्सीची जबाबदारी दिली गेल्यामुळे अनेकांनी टीका केली होती. आता सीएसकेविरुद्धच्या विजयानंतर रियान परागने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. बाहेरच्यांची मतं आणि कारण नसताना सुरू असलेला गोंधळ याने मला फरक पडत नाही, असं रियान पराग म्हणाला आहे.
काय म्हणाला रियान पराग?
मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रियान परागने त्याच्या कॅप्टन्सीवर होत असलेल्या चर्चांवर भाष्य केलं. 'मी बाहेरून होत असलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहे. मी फक्त माझा खेळ आणि माझ्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करत आहे. जर मी माझ्या प्रवासाबद्दल बोलायला लागलो तर उत्तर खूप मोठं होईल. माझ्या खेळापेक्षा जास्त बाहेरच्या गोष्टी बोलल्या जातात, अनेक जण मत देतात, या गोष्टींचा आपल्यावर फरक पडता कामा नये, हे मी शिकलो आहे. मी चांगलं करत आहे आणि यावर्षीही तसंच करेन', असं वक्तव्य रियान परागने केलं आहे.
advertisement
'क्रिकेटची कहाणी कायम निकालांनुसार बदलते, मग तुमचा निर्णय योग्य असो नाहीतर चुकीचा. जर माझ्या आजच्या निर्णयांमुळे चेन्नईने 200 रन केल्या असत्या आणि आमचा पराभव झाला असता, तर मी किती वाईट कर्णधार आहे, माझे निर्णय कसे चुकीचे आहेत, हे बोललं गेलं असतं', असा टोला रियान परागने लगावला.
कॅप्टन्सीवरून परागवर टीका
आयपीएल 2026 आधी राजस्थानने रियान परागला पूर्णवेळ कर्णधार केलं. संजू सॅमसनच्या गैरहजेरीमध्ये 2025 च्या आयपीएलमध्येही रियान पराग राजस्थानचा कर्णधार होता, पण या 8 सामन्यांमध्ये टीमला फक्त 2 विजय मिळाले होते. भारताचे माजी क्रिकेटपटू क्रिस श्रीकांत यांनीही परागला कर्णधार करण्याच्या निर्णयावर टीका केली होती. खराब रेकॉर्डनंतरही रियान परागला पाठिंबा दिला जात आहे, असं श्रीकांत म्हणाले होते.
राजस्थानच्या टीममध्ये रवींद्र जडेजा आणि यशस्वी जयस्वालसारखे अनुभवी खेळाडू असतानाही रियान परागला कर्णधार करणं काही क्रिकेटपटू आणि चाहत्यांना रुचलं नव्हतं.
