शेवटच्या ओव्हरपूर्वी नेमके काय घडलं?
मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये लाहोर कलंदर्सचा कॅप्टन शाहीन शाह आफ्रिदी याने पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक रमीझ राजा यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या ओव्हरपूर्वी नेमके काय घडलं? असा थेट प्रश्न रमीझ यांनी विचारल्यावर शाहीन काहीसा गोंधळलेला दिसला. त्यावेळी रमीझ राजा यांनी हार न मानता शाहीनला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
advertisement
मला काहीही माहिती नाही - शाहिन शाह आफ्रिदी
"बॉल टॅम्परिंगमुळे तुमच्याकडून बॉल काढून घेण्यात आला, यावर तुझे काय मत आहे?" असा बोचरा प्रश्न रमीझ राजा यांनी विचारला. यावर शाहीनने उत्तर दिलं की, "मला याविषयी काहीही माहिती नाही. आम्ही कॅमेऱ्यात नेमकं काय झालं ते पाहू आणि त्यानंतरच कोणामुळे हे घडले यावर चर्चा करू", असं शाहीन आफ्रिदी म्हणाला. अंपायर्सनी 5 रन्स कापले आणि आम्ही त्या क्षणी काहीच करू शकलो नाही, असं म्हणत शाहीनने नाराजी व्यक्त केली.
खेळाडूंना विश्वासात घेतलं गेलं नाही -शाहिन शाह आफ्रिदी
शाहीनने रमीझ यांच्याशी बोलताना पुढं स्पष्ट केलं की, जेव्हा त्याने अंपायर्सना बॉल बदलण्याचे कारण विचारलं, तेव्हा त्यांनी त्याला तिथून जाण्यास सांगितलं. अंपायर्सनी कॅप्टनलाही बाजूला सारून फिल्डिंगच्या जागी परतण्यास बजावलं, असंही शाहीन यावेळी म्हणाला. या संपूर्ण प्रक्रियेत खेळाडूंना विश्वासात घेतलं गेलं नाही, असा आरोप देखील शाहीनने यावेळी केला आहे.
मी कधीही प्रयत्न केला नाही - शाहीन आफ्रिदी
दरम्यान, मी फक्त माझ्याबद्दल सांगू शकतो. बॉलची स्थिती बदलण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही. आम्ही असं काहीही करू शकत नाही. मला फक्त एवढंच आठवतंय की, जेव्हा मी बॉल सुकवण्याचा आणि त्याला चमकवण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा अंपायर्सनी मला शर्टच्या खाली बॉल सुकवू नका, असं आम्हाला सांगितलं होतं, त्यानंतर आमच्याकडून काहीही घडलं नाही, असं शाहीन आफ्रिदी याने म्हटलं आहे.
