पुन्हा विचार करण्याची विनंती
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) एक महत्त्वाचे पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी पाकिस्तानला भारताविरुद्धची मॅच न खेळण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे. ही हाय-व्होल्टेज मॅच 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे, ज्याबद्दल सध्या अनिश्चितता निर्माण झाली आहे.
advertisement
गंभीर परिणाम होतील - श्रीलंका क्रिकेट बोर्ड
श्रीलंकेला या मॅचच्या रद्द होण्याच्या वृत्तामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती वाटत आहे. यजमान देश म्हणून त्यांनी लॉजिस्टिक्स, सुरक्षा आणि व्यावसायिक स्तरावर सर्व तयारी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या मॅचसाठी तिकीट विक्री अत्यंत जोरात झाली असून, मॅच न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
देशाला आर्थिक फटका बसेल
पाकिस्तानने या मॅचमधून माघार घेतल्यास श्रीलंकेच्या पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही गदा येणार आहे. श्रीलंकेने स्पष्टपणं सांगितलं की, अशा मोठ्या मॅचचे आयोजन रद्द झाल्यामुळे यजमान देशाला आर्थिक फटका बसेल. श्रीलंकेने पाकिस्तानला या पत्राद्वारे एका संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली असून, ही मॅच खेळणे दोन्ही देशांच्या हिताचे असल्याचे सुचवलं आहे.
पाकिस्तानला उपकाराची जाणीव आहे का?
श्रीलंकेने लिहिलेल्या या पत्रात पाकिस्तानला जुन्या दिवसांची आठवण करून दिली. जेव्हा इतर क्रिकेट टीम्स पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार देत होत्या, तेव्हा अत्यंत कठीण आणि संवेदनशील परिस्थितीतही श्रीलंकेने पाकिस्तानात जाऊन मॅच खेळल्या होत्या. दोन्ही बोर्डांमधील आपसी सन्मानापोटी आम्ही तो निर्णय घेतला होता, याची जाणीव शम्मी सिल्वा यांनी करून दिली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला श्रीलंकेच्या उपकाराची जाणीव आहे की नाही? याचं उत्तर येत्या काही दिवसात पहायला मिळेल.
क्रिकेट विश्वात वादाची ठिणगी
दरम्यान, 15 फेब्रुवारीला होणारी ही मॅच केवळ क्रिकेटसाठीच नाही, तर श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाची मानली जात आहे. जर पाकिस्तानने आपला निर्णय बदलला नाही, तर क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
