''आई, मी येतो गं खेळून..."
विरारच्या बोलिंज परिसरात तलावात बुडून 13 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अर्णव विनायक पाटील असे मृत मुलाचे नाव आहे. अर्णव आपल्या कुटुंबासोबत बोळिंज खारोडी येथे राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवजयंतीनिमित्त शाळेला सुटी असल्याने अर्णव आपल्या मित्रांसोबत जवळील राम मंदिर तलावाजवळ खेळण्यासाठी गेला होता. खेळता खेळता तो तलावातील एका तराफ्यावर बसला आणि तसाच तो काही वेळानंतर तो पाण्यात उतरला. मात्र पाण्याची खोली आणि अंदाज न आल्यामुळे तो अचानक बुडाला याच वेळी अर्णवला पाण्यात बुडताना पाहून त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवळपास तीन ते चार तास शोधमोहीम राबवून अखेर अर्णवचा शोध लागला. त्याला तातडीने विरार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी प्रकारामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
