दरम्यान, आजपासून बोगदा खोदण्यासाठी, 13 मीटर व्यासाचे, 150 मीटर लांबीचे आणि 60 मीटर रुंदीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे ‘नायक’ नावाचे टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) ठाणे लॉन्चिंग शाफ्टमध्ये, अर्थात भूगर्भात सोडले जाणार आहे. येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये प्रत्यक्ष बोगदा खोदण्याच्या कामाला सुरवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाण्याहून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरण पूर्ण करून ‘नायक’ भूगर्भातून बाहेर येणार आहे. ‘नायक’ भूगर्भात सोडल्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित तीन टीबीएम मशीन यावर्षीच उर्वरित भुयारीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी सज्ज होणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून दिली आहे.
advertisement
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून (एसजीएनपी) बांधण्यात येत असलेल्या ह्या बोगद्यामुळे पुढे भविष्यातील अनेक प्रश्न सुटणार आहेत. सोबतच कनेक्टिव्हिटीही सुधारणार आहे. एक ते दीड तासांचा अवधी लागणारा ठाणे ते बोरिवली प्रवास आता लवकरच 15 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. सध्याच्या घडीला, ठाण्यातून बोरिवलीला जाण्यासाठी घोडबंदर रोडचा किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा वाहतुकदारांना वापर करावा लागतो. प्रचंड वाहतुकीमुळे, या 23 किलोमीटरच्या अंतरासाठी १ ते दीड तासांचा अवधी लागतो. मात्र, आता 11.8 किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा फक्त 15 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणे शक्य असणार आहे. या बोगद्यामुळे तब्बल 12 किमीचा प्रवास कमी होणार आहे.
भारतातील सर्वात मोठे सिंगल- शील्ड हार्ड रॉक टनल बोरिंग मशीन (TBM) बोगदा खोदणाऱ्या मशीनचे नाव, 'नायक' असं ठेवण्यात आलं आहे. हे 'नायक'मशीन लवकरच बोगदा खोदण्याच्या कामाला जोरदार सुरूवात करणार आहे. यासोबतच 'अर्जुन' नावाचे दुसरे यंत्रही लवकरच कामासाठी सेवेमध्ये दाखल होणार आहे. हे यंत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कोणत्याही जीवसृष्टीला किंचीत असा धक्का न लावता भुयारी मार्ग तयार करणार आहे. एमएमआरडीएकडून हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे मानस आहे. सध्या, टनल बोरिंग मशीन (TBM) आणि लॉन्च पॅडच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 18,000 कोटी रुपये खर्च लागणार असल्याचे बोलले जात आहे.
18,000 कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी वन विभागाकडून आवश्यक असलेली जमीन हस्तांतरणाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार असल्यामुळे, पर्यावरणप्रेमींकडून या प्रकल्पाला विरोध होण्याची शक्यता होती. एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की, हा बोगदा जमिनीपासून अंदाजे 23 मीटर खाली आहे, ज्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव आणि वनस्पतींना कोणतीही हानी पोहोचणार नाही. शिवाय, बोगद्याच्या बांधकामामुळे कार्बन उत्सर्जन दरवर्षी अंदाजे 1,50,000 मेट्रिक टननी कमी होईल, कारण वाहनांना यापुढे लांब आणि गर्दीच्या मार्गांवरून प्रवास करावा लागणार नाही.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
एकूण लांबी: 11.8 किलोमीटर (10.25 किमी बोगदा).
लेनची संख्या: प्रत्येक बोगद्यात 3 लेन (एकूण 6 लेन).
सुरक्षा: दर 300 मीटरवर आडवे मार्ग आणि आधुनिक वायुवीजन प्रणाली.
कनेक्टिव्हिटी: बोरिवलीतील मागाठाणे (एकता नगर) आणि ठाण्यातील टिकुजी-नी-वाडी (मानपाडा) या परिसराला जोडेल.
