लोकलमधील वादाचे भयंकर रूप
ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरात रेल्वे प्रवासादरम्यान दोन तरुणांवर चाकूने हल्ला झालेला आहे. ज्यात दोघही कासीम शाह (वय 20) आणि त्याचा भाऊ उस्मान शाह (वय 22) हे दोघे विक्रोळी येथे फॅब्रिकेशनचे काम करून सायंकाळी लोकलने मुलुंडला घरी जात होते.
लोकलमधील वादाचे कारण काय?
14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या लोकलमध्ये आधीच बसलेल्या चार अनोळखी तरुणांनी कासीम आणि उस्मान यांच्याकडे रागाने पाहिले. 'रागाने का पाहता?' असा प्रश्न कासीमने विचारताच वाद सुरू झाला. या वादातून त्या चौघांनी दोघांना मुलुंडला उतरू दिले नाही आणि कळवा येथे उतरायला भाग पाडले.
advertisement
कळव्यात जीवघेणा हल्ला
कळवा येथील शांतीनगर हनुमान मंदिराजवळ दोन्ही गटांमध्ये जोरदार झटापट झाली. या गोंधळात कासीमच्या खिशातील सुमारे 1,500 रुपये गायब झाले. दरम्यान हल्लेखोरांपैकी एकाने उस्मानवर चाकूने वार केला. जखमी उस्मानला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाणे येथे चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
