मुझफ्फराबाद: पाकव्याप्त काश्मीरचे (PoK) माजी पंतप्रधान चौधरी अन्वारुल हक यांनी भारतावरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. हक यांनी एका वक्तव्यात स्पष्टपणे मान्य केले की, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यापासून ते काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला लक्ष्य केले आहे. माजी पंतप्रधानांचे हे विधान 10 नोव्हेंबरला दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटानंतर आले आहे, ज्यात 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
advertisement
PoK विधानसभेत हक यांनी दिलेले वक्तव्य गंभीर आहे. मी आधीच सांगितले होते की, जर भारताने बलुचिस्तानला रक्तात बुडवत राहण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतावर वार करू. यानंतर काही दिवसांतच आमच्या 'शाहिनांनी' आत घुसून हल्ला केला आणि असा हल्ला केला की आजही मृतांची मोजणी झालेली नाही. हक यांनी आपल्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारलाही आव्हान दिल्याचे म्हटले. 'काश्मीरचे जंगल' या त्यांच्या विधानाचा अर्थ पहलगाममध्ये झालेल्या त्या भीषण दहशतवादी हल्ल्याशी जोडला जात आहे.
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता, तर 16 जण गंभीर जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारावर निवडून लक्ष्य केले होते, असे या घटनेच्या माहितीवरून स्पष्ट होते. याशिवाय दिल्लीतील स्फोट प्रकरणी आतापर्यंत 5 डॉक्टरांसह एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे.
पाक सरकारने झटकले हात
पाकिस्तानने हक यांच्या या विधानापासून स्वतःला लगेच दूर ठेवत, ही त्यांची 'राजकीय चूक' असल्याचे म्हटले आहे. कारण अविश्वास प्रस्तावाद्वारे त्यांना नुकतेच पदावरून हटवण्यात आले आहे. PoK विधानसभेत सोमवारी अविश्वास प्रस्ताव पास झाल्यानंतर चौधरी अन्वारुल हक यांना पंतप्रधान पद सोडावे लागले होते. त्यांच्या विरोधात 36, तर समर्थनात केवळ 2 मते पडली. या राजकीय घडामोडीनंतर PoK ला गेल्या चार वर्षांत चौथा पंतप्रधान (पीपीपीचे राजा फैसल मुमताज राठौर) मिळाला आहे. प्रस्तावाच्या बाजूने पीपीपीच्या 28 आणि पीएमएल-एनच्या 8 आमदारांनी मतदान केले होते.
