ढाका: ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत जमात-ए-इस्लामीशी संबंधित विद्यार्थी संघटना ‘इस्लामी छात्र शिबिर’ (ICS) ने मोठा विजय मिळवला आहे. 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असे घडले आहे की, एखाद्या इस्लामिक विद्यार्थी समूहाने विद्यापीठाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
advertisement
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या घटनेला अत्यंत गंभीर मानले आहे. त्यांनी लिहिले की- ही घटना भारतीयांसाठी जरी एक छोटी बातमी वाटत असली. तरी तिचे परिणाम दूरगामी असू शकतात. भारताचा सर्वात मोठा शत्रू सत्तेत येईल का आणि आपल्याला त्याचा सामना करावा लागेल का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शशी थरूर यांनी ‘एक्स’ (X) वर लिहिले की- या घटनेमुळे भारतीयांच्या मनात फारशी खळबळ माजली नसेल; पण हे येणाऱ्या दिवसांसाठी एक चिंताजनक संकेत आहे. बांगलादेशमधील दोन्ही प्रमुख पक्ष, अवामी लीग आणि बांगलादेश नॅशनल पार्टी यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी वाढत आहे. दोन्ही पक्ष भ्रष्टाचार आणि कुप्रशासनात बुडाले आहेत, असे लोक म्हणत आहेत. याच कारणामुळे मतदार आता जमात-ए-इस्लामीकडे वळत आहेत. ते धार्मिक कट्टरपंथी असल्यामुळे नाही, तर जमात अजून तरी भ्रष्टाचाराच्या डागापासून दूर आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल? नवी दिल्लीला आपल्या सीमेवरील देशात जमातच्या बहुमताच्या सरकारचा सामना करावा लागेल का? असे प्रश्न थरूर यांनी उपस्थित केले आहेत.
भारतासाठी चिंता का?
भारत जमात-ए-इस्लामीकडे दीर्घकाळापासून संशयाच्या नजरेने पाहत आहे. 1971च्या बांगलादेश मुक्ती संग्रामादरम्यान या संघटनेवर पाकिस्तानी सैन्याला पाठिंबा दिल्याचा आरोप होता. याव्यतिरिक्त या संघटनेवर भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादी नेटवर्कला समर्थन देण्याचे अनेक आरोप आहेत. अशा परिस्थितीत जर ही संघटना सार्वत्रिक निवडणुकीत मोठी ताकद म्हणून उदयास आली, तर भारताच्या पूर्व सीमेवरील सुरक्षेच्या दृष्टीने अडचणी वाढू शकतात. भारतात या संघटनांवर बंदी आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये जर त्यांच्या कारवाया वाढल्या आणि ते सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आले, तर समस्या वाढू शकतात.
बदलत्या राजकारणाचा संकेत
बांगलादेशमधील जनता दोन्ही पारंपरिक पक्षांपासून दूर जात आहे. सततचा भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाई यामुळे मतदारांना नवीन पर्याय शोधण्यास भाग पाडले आहे. जमात-ए-इस्लामी याच रिकाम्या जागेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या पक्षाने, बीएनपीने, निवडणुकीचे निकाल पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की- हे निकाल पूर्वनियोजित हेराफेरीचा परिणाम आहेत आणि संपूर्ण निवडणूक एक नाटक होती. मात्र निरीक्षकांचे मत आहे की, हे निकाल बांगलादेशच्या राजकारणात नवीन समीकरणे दर्शवित आहेत.