मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने काबुलमधील एका रुग्णालयाला लक्ष्य करून हवाई हल्ला केला. तालिबानच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, काबुलमधील एका रुग्णालयाच्या आवारातच असलेल्या 'नशामुक्ती केंद्रा'वर पाकिस्तानने हवाई हल्ला केला. यात किमान ४०० लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे २५० लोक जखमी झाले आहेत.
'पीटीआय' (PTI) या वृत्तसंस्थेनुसार, तालिबान सरकारने असा दावा केला आहे की, पाकिस्तानी हवाई हल्ल्यात रुग्णालयाचा एक मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. आतापर्यंत ४०० मृत्यूंची अधिकृतपणे पुष्टी करण्यात आली आहे, तर शेकडो लोक अजूनही जखमी अवस्थेत आहेत. तालिबानने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
advertisement
दुसरीकडे, पाकिस्तानने मात्र अफगाण सरकारचे हे आरोप फेटाळून लावले असून ते पूर्णपणे निराधार असल्याचं म्हटलं आहे. काबुलमधील कोणत्याही रुग्णालयाला लक्ष्य केल्याचा आरोप पाकिस्ताननं ठामपणे नाकारला आहे. विशेष म्हणजे, हा हल्ला होण्यापूर्वी अफगाण अधिकाऱ्यांनी दोन्ही देशांच्या सीमेवर दोन्ही बाजुंनी गोळीबार केल्याच्या घटनेला दुजोरा देणारं एका निवेदन जारी केलं. यानंतर अवघ्या काही तासांतच हा कथित हल्ला झाला. सीमेपलीकडून झालेल्या त्या गोळीबाराच्या घटनेत चार अफगाणिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला होता.
विविध मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानी लष्करानं काबुलच्या एका नशामुक्ती केंद्रावर हल्ला केला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली. या घटनेनंतर, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पाकिस्तानचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. सरकारी प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी 'X' अकाऊंटवर केलेल्या एका पोस्टमध्ये या हल्ल्याचा निषेध केला असून, याला अफगाणिस्तानच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचं उघड उल्लंघन झाल्याचं संबोधलं आहे. त्यांनी सांगितलं की, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांपैकी बहुतांश व्यक्ती या अंमली पदार्थांच्या व्यसनावर उपचार घेत असलेल्या रुग्ण होत्या. दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मुशर्रफ झैदी यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, काबुलमधील कोणत्याही रुग्णालयाला लक्ष्य करण्यात आले नसल्याचा दावा केला आहे.
हल्ला कधी आणि कसा घडला?
अफगाण सरकारचे उप-प्रवक्ते यांनी माहिती दिली की, सोमवारी स्थानिक वेळेनुसार रात्री नऊ वाजता, शहरात मोठ्या स्फोटांचे आवाज घुमले. याला प्रत्युत्तर म्हणून विमानविरोधी तोफांतून फायरींग करण्यात आली. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आणि सुरक्षिततेच्या शोधात पळून जाण्यासाठी त्यांची एकच धावपळ उडाली. या घटनेत ४०० लोकांचा मृत्यू झाला.
