Devkhel Web Series: प्राजक्ता माळीच्या 'देवखेळ' वेबसीरीजने भावना दुखावल्या, आशिष शेलारांचे CM फडणवीसांना पत्र
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'देवखेळ' वेब सीरिजमुळे कोकणात अंसतोष निर्माण झाल्यामुळे ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबद्दल त्यांनी एक्स पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्या 'देवखेळ' या वेब सीरिजची चर्चा सर्वत्र आहे. सात एपिसोडची ही वेबसीरीज 30 जानेवारी रोजी 'Zee 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोकणवासियांनी या वेब सीरिजचा विरोध केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वेबसीरीजला विरोध होत असताना ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोकणातील देवतळी गावातील गोष्ट पाहायला मिळते. देवतळी हे गाव काल्पनिक आहे. कोकणामध्ये होळीच्या वेळी शंकासुर पाहायला मिळतो. शंकासुर जो व्यक्ती पाप करतो, त्याला शंकासूर शिक्षा करतो, असं गावातल्या लोकांची समज आहे. याच गावात विश्वास सरंजामे हा पोलिस इन्स्पेक्टर येतो. श्रद्धेला स्थान असावं, अंधश्रद्धेला नाही असे म्हणत गेल्या 15 वर्षांपासून दरवर्षी होणार्या खूनामागे नेमके कोण आहे, हे तो शोधून काढतो. असं या वेबसीरीजचं कथानक आहे. मात्र, ही वेबसीरीज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 'देवखेळ' वेब सीरिजमुळे कोकणवासीयांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे वेबसीरीजच्या निर्मात्यांवर आणि दिग्दर्शकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 'देवखेळ' वेब सीरिजमुळे कोकणात अंसतोष निर्माण झाल्यामुळे ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबद्दल त्यांनी एक्स (ट्वीटर) पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
झी 5 वरिल "देवखेळे" या वेबसिरिज मुळे महाराष्ट्र शासन जतन संवर्धन करीत असलेल्या "नमन-खेळे" या पौराणिक व खूप जुन्या हिंदू लोककलेला व परंपरेला धक्का लागला असल्याची जनमानसात भावना तीव्र दिसून येत आहे. त्या विरोधात कोकणात रोष वाढत असून वेबसिरिजवर बंदी घालण्याची मागणीने जोर धरला आहे.… pic.twitter.com/agqqWiJHxN
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 7, 2026
advertisement
ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या पत्रामध्ये काय म्हटलंय?
"देवखेळ" ही वेबसिरिज नुकतीच झी 5 या ओटीटीवर प्रसारित करण्यात आली आहे. ही वेबसिरिज रत्नागिरी जिल्ह्यातील "नमन-खेळे" या लोकलेचे विपरीत चित्रण करणारी आणि या लोककलेतील लोकदैवत ठरलेल्या "शंकासूर" या प्रमुख पात्राचे अवमानकारक चित्रण करणारी आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या वेबसिरिजला कोकणातून तिव्र विरोध करण्यात येतो आहे. या लोक कलेचे जतन संवर्धन करणाऱ्या कलावंताच्या विविध संघटनांनी त्याला विरोध करून सरकार म्हणून मला निवेदनही दिले आहे.
advertisement
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नमन खेळे ही अत्यंत लोकप्रिय आणि पौराणिक लोककला असून सामाजिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालेली ही हिंदू प्रथा परंपरा जतन करणाऱ्या लोककलेती एक अग्रगण्य लोककला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामदैवतांशी या लोककलेचा थेट संदर्भ असल्याने त्याला धार्मिक दृष्टीने एक पावित्र्य आणि अधिष्ठान ही प्राप्त झाले आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्यामार्फत ही कला जतन व संवर्धन करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. कोकणात शिमग्यात या कलेचा जागर सर्वत्र होत असल्याने 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आपल्या शासनातर्फे या नमन कलेचा महोत्सव ही आयोजित करण्यात आला आहे. या कलेत योगदान देणाऱ्या कलावंतांना आपण राज्य शासनाचे पुरस्कार देऊन सन्मानित करतो तसेच तसेच वृद्ध कलावंत मानधन योजनेतही या कलेचा समावेश शासनाने केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सन्मान केलेली ही लोककला आहे.
advertisement
त्यामुळे या वेबसिरिज मुळे पौराणिक आणि खूप जुन्या लोकपरंपरेला धक्का लागला असल्याची जनमानसात भावना तीव्र दिसून येत आहे, या वेबसिरिजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत असून वेबसिरिज विरोधात वाढता रोष आणि कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणारा शिमग्याचा सण जवळ आला असताना अशाप्रकारचे गढूळ वातावरण निर्माण होणे योग्य नाही.
म्हणूनच आपण याबाबत लक्ष घालून तातडीने योग्य आणि उचित कारवाई करावी ही विनंती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 8:48 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Devkhel Web Series: प्राजक्ता माळीच्या 'देवखेळ' वेबसीरीजने भावना दुखावल्या, आशिष शेलारांचे CM फडणवीसांना पत्र







