पाऊस आला पण घाम फोडून गेला! उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा पारा पुन्हा वाढणार, महाराष्ट्रावर नवं संकट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस थांबून उकाडा वाढला, १० एप्रिलनंतर तापमान ४० अंशांवर जाण्याचा अंदाज, शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाचा सल्ला
मुंबईसह उपनगरात सकाळी आणि संध्याकाळी काही अंशा ढगाळ वातावरण आण दुपारी उन्हाचे कडक चटके बसत आहेत. गेल्या आठवड्यात अस्मानी संकटानं जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला चांगलंच झोडपून काढलं. ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्यानं चटके कमी झाले, गारवा आला, पण दिलासा मिळतो असं वाटेपर्यंत पुन्हा उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या. हवामान तज्ज्ञांच्या मते, १० एप्रिलनंतर पारा पुन्हा एकदा ४० अंशांच्या पार जाण्याची दाट शक्यता आहे.
पाऊस थांबला, पण घाम सुटेना!
सध्या पाऊस थांबला असला तरी लोकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे हवेतील आर्द्रता. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे जमिनीमध्ये प्रचंड ओलावा साठला आहे. आता जसं ऊन पडतंय, तशी या ओलाव्याची वाफ होऊन हवेत दमटपणा वाढला आहे. ६ आणि ७ एप्रिलला जरी तापमानाचा आकडा ३५-३६ च्या आसपास दिसत असला, तरी प्रत्यक्षात तो ४० अंशासारखा भासत आहे.
advertisement
पुढील ७ दिवसांचा नेमका अंदाज काय?
हवामान अभ्यासक नीलेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिलपासून राज्यावरील पावसाचे ढग पूर्णपणे विरले आहेत. आता आकाश स्वच्छ आणि कोरडं होणार आहे. ७ ते १० एप्रिल या काळात वातावरण पूर्णपणे निरभ्र राहील. याचा अर्थ असा की, सूर्याची किरणं थेट जमिनीवर पडणार असून तापमानात झपाट्याने वाढ होणार आहे. दिवसाचं तापमान ३६ अंशांपासून सुरू होऊन अवघ्या चार-पाच दिवसांत ४० अंशांहून अधिक राहण्याची शक्यता आहे. एक दिलासादायक बाब म्हणजे रात्रीचं तापमान १९ ते २१ अंशांच्या दरम्यान स्थिर राहील. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुखद गारवा जाणवेल. पण १० एप्रिलनंतर मात्र रात्रीचाही उकाडा वाढण्याची चिन्हं आहेत.
advertisement
पश्चिमी विक्षोभाचा काय परिणाम होणार?
उत्तर भारतात ७ एप्रिलपासून पुन्हा एकदा एक नवीन 'पश्चिमी विक्षोभ' सक्रिय होत आहे. साधारणपणे यामुळे आपल्याकडे पाऊस येतो, पण यावेळी जळगावकर आणि उत्तर महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी ही आहे की, या विक्षोभाचा प्रभाव आपल्यावर अत्यंत कमी असेल. त्यामुळे या आठवड्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस येण्याची धास्ती आता बाळगण्याची गरज नाही. हवामान आता स्थिर झालं असून केवळ 'उन्हाळा' हाच मुख्य ऋतू अनुभवायला मिळेल.
advertisement
शेतकऱ्यांनो, आता सावध व्हा!
विदर्भ वगळता गारपिटीचा कुठेही इशारा देण्यात आलेला नाही. पावसानं आधीच पिकांचं अतोनात नुकसान केलं आहे. आता वाढत्या उन्हामुळे बागायतदारांची चिंता वाढणार आहे. १० एप्रिलनंतर उष्णतेची लाट पुन्हा सक्रिय होऊ शकते. त्यामुळे केळी, संत्रा आणि इतर फळबागांना पाणी देताना वेळापत्रक पाळावं लागणार आहे. दुपारच्या वेळी बागांना पाण्याची कमतरता भासू देऊ नका, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 8:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पाऊस आला पण घाम फोडून गेला! उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा पारा पुन्हा वाढणार, महाराष्ट्रावर नवं संकट









