Rain Update: हवामानात मोठे बदल! विदर्भ-मराठवाड्यात पावसाचे सावट; तर मुंबई-पुण्यात उन्हाचा चटका वाढणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शिमग्याआधी का आला पाऊस? विदर्भाला अवकाळीचा विळखा! मध्यरात्री पावसाचं थैमान, आज तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती? पाहा हवामान विभागाचा अलर्ट
फेब्रुवारी महिना संपायच्या वाटेवर आणि शिमग्याआधीच महाराष्ट्रातील हवामानाने पुन्हा एकदा खो दिला आहे. अचानक वाढलेली उष्णता आणि त्यादरम्यान आलेला अवकाळी पाऊस यामुळे विचित्र वातावरण तयार झालं आहे. एकीकडे अंगाची लाहीलाही होत असताना आता अवकाळी पावसाची एन्ट्री झाली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं असून, हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचा इशारा दिला.
पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. आज लातूर नांदेड हिंगोली धाराशिव सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तर नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. काल मध्यरात्री नागपुरात जो पाऊस झाला, त्याचे ढग आता पूर्व विदर्भाकडे सरकले असून, शेतकरी बांधवांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
नागपूरकरांसाठी रविवारची रात्र वैऱ्याची ठरली. दिवसभर उष्णतेचा पारा चढलेला असताना रात्री अचानक ढग दाटून आले आणि पावसाने जोर धरला. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या संकटामुळे उन्हाळी पिकांचे तर नुकसान झालेच, शिवाय शहरातील काही कच्च्या घरांचे आणि पत्र्यांच्या शेडचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली.
advertisement
नागपूरप्रमाणेच मराठवाड्यातील हवामानही बदललं आहे. लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी, शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. आता उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
हिमालयीन भागात २२ तारखेला एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स धडकणार आहे. मात्र, तो अत्यंत कमकुवत असल्याने त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रावर किंवा मध्य भारतावर होणार नाही. केवळ दक्षिण आणि पूर्व भारताकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या दाबामुळे महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. येत्या ४८ तासांत विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्याने पावसासाठी तयार राहावे, तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाने वाढत्या उन्हापासून संरक्षणाची तयारी करावी.
advertisement
दुसरीकडे मुंबईसह उपनगर आणि कोकण किनारपट्टीवर उष्णता वाढली आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. रात्री देखील प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. पंखा, AC शिवाय रात्री झोपणही अशक्य झालं आहे. अचानक 36 ते 38 डिग्रीपर्यंत तापमान वाढ झाली आहे.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 8:13 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rain Update: हवामानात मोठे बदल! विदर्भ-मराठवाड्यात पावसाचे सावट; तर मुंबई-पुण्यात उन्हाचा चटका वाढणार








