महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड, अजित पवार गटाचा मंत्री नॉट रिचेबल, कारण समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना अजित पवार गटाचे एक मंत्री नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ घडत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र करण्यासाठी शरद पवार गटाकडून हालचाली केल्या जात आहेत. तर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांकडून विलीनीकरणाला विरोध होत आहे. एकीकडे विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे.
खरं तर, मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात झालेल्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे राज्याचं राजकारण तापलं आहे. या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांचे नाव चर्चेत आल्याने ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे, कारवाई झाल्यापासून झिरवाळ हे 'नॉट रिचेबल' असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
नेमके प्रकरण काय?
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका मेडिकल स्टोअरचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. अटकेनंतर ढेरंगे याने खळबळजनक दावा केला की, त्याने ही लाच मंत्री झिरवाळ यांच्या खासगी सचिवाच्या सूचनेनुसार घेतली होती. या खुलाशामुळे थेट मंत्र्यांचे कार्यालय संशयाच्या भोऱ्यात सापडले आहे.
advertisement
झिरवाळ 'नॉट रिचेबल'; आदिवासी संमेलनाला दांडी
लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी त्यांचे शनिवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. नाशिकमध्ये आयोजित पहिल्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य व सांस्कृतिक संमेलनाचे उद्घाटन झिरवाळ यांच्या हस्ते होणार होते. मात्र, ऐनवेळी ते अनुपस्थित राहिल्याने आयोजकांची मोठी तारांबळ उडाली.
राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. "मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनातच भ्रष्टाचार होत असेल, तर हे सरकार नेमके कोणासाठी चालले आहे?" असा सवाल करत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, झिरवाळ यांनी "आपला या प्रकरणाशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा देणार" अशी भूमिका यापूर्वीच मांडली आहे.
advertisement
"ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी मी मुंबईत नव्हतो. या प्रकरणात माझा किंवा माझ्या कार्यालयाचा दोष आढळल्यास मी नैतिकता जपून पदावरून पायउतार होईन," असं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलं आहे. शिवाय सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार आहेत, असं स्पष्टीकरणही झिरवाळ यांनी दिलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 11:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड, अजित पवार गटाचा मंत्री नॉट रिचेबल, कारण समोर







