Nagpur Crime : सात महिनेही टिकला नाही संसार! हळदी–कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेली अन् काळाने झडप घातली, गावावर दु:खाचा डोंगर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Nagpur Accident News : अलिशा आणि मोनाली या दोघी भुगाव येथे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात होत्या. त्याच वेळी मागून येणाऱ्या एका वेगवान वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली.
Nagpur Crime News : नागपूर-भंडारा महामार्गावर शनिवारी एक हृदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा करुण अंत झाला आहे. महालगावजवळ नाग नदीच्या पुलावर एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या अपघातामध्ये अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या दोन तरुण महिलांना आपले प्राण गमवावे लागले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, अलिशा आणि मोनाली या दोघी भुगाव येथे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात होत्या. त्याच वेळी मागून येणाऱ्या एका वेगवान वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघीही रस्त्यावर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोनाली घाटोळे यांचा उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
advertisement
काळाने झडप घातली
अपघातातील मृत अलिशा मेहर या पिपळा डाक बंगला येथील रहिवासी होत्या. अत्यंत दुःखद बाब म्हणजे, अलिशा यांचा विवाह केवळ 7 महिन्यांपूर्वीच झाला होता. संसाराची नवी स्वप्ने पाहत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. एका हसत्याखेळत्या कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे मेहर आणि घाटोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
लग्नाचे सनई-चौघडे वाजणार होते पण...
दुसरीकडे, मोनाली घाटोळे हिचा विवाह येत्या 26 फेब्रुवारीला निश्चित झाला होता. घरात लग्नाची लगबग सुरू होती, लग्नाची खरेदी आणि तयारी अंतिम टप्प्यात असतानाच ही दुर्घटना घडली. ज्या घरात लग्नाचे सनई-चौघडे वाजणार होते, तिथे आता शोककळा पसरली आहे. लग्नापूर्वीच मुलीचा असा अंत झाल्याने नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 11:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Crime : सात महिनेही टिकला नाही संसार! हळदी–कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेली अन् काळाने झडप घातली, गावावर दु:खाचा डोंगर







