Mumbai Accident: धनिक बापाचा अल्पवयीन मुलगा मुंबईच्या रस्त्यावर सुसाट! Kia ने दुचाकीला चिरडलं, नवरा-बायको मृत्यूच्या दारात
- Published by:Prachi Amale
Last Updated:
17 वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्यंत वेगात चालवलेल्या किया सेलटास कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली.
मुंबई : मुंबईत अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चालवलेल्या कारमुळे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्याविहार येथील सोमय्या कॉलेजच्या गेट क्रमांक 3 समोर (5 फेब्रुवारी) गुरुवारी उशिरा रात्री हा अपघात घडला. 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने अत्यंत वेगात चालवलेल्या किया सेलटास कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कूटरवरून जाणारे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात जखमी झालेल्या दांपत्याची नावे धुरमिल पटेल आणि मिनल पटेल अशी आहेत. दोघांनाही तातडीने जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून मिनल पटेल यांना गंभीर स्वरूपाची अंतर्गत इजा झाल्याचे निदर्शनास आले आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
advertisement
लायसन्स नसताना गाडी कशी दिली?
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातास कारणीभूत असलेला चालक हा अल्पवयीन असून त्याचे वय अवघ्या 17 वर्षाचा आहे. त्याच्याकडे वैध वाहनचालक परवाना नसतानाही तो कार चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित किया सेलटास कार ही त्याच्या वडिलांची असून, कारचे मालक वालजी राजा भूषण असे आहेत. अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यासाठी कार देण्यात आल्याने आणि त्यातून हा गंभीर अपघात घडल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
advertisement
अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यासह संबंधित कलमान्वये पुढील तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे अपघाताची सविस्तर माहिती गोळा केली जात आहे.
वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप
दरम्यान, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, पालकांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी, अशी मागणी होत आहे. या अपघातामुळे रस्ते सुरक्षेबाबत अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. या अगोदर देखील पुण्यात झालेल्या कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातात दोन जणांचा बळी गेला होता. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले होते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 4:10 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Accident: धनिक बापाचा अल्पवयीन मुलगा मुंबईच्या रस्त्यावर सुसाट! Kia ने दुचाकीला चिरडलं, नवरा-बायको मृत्यूच्या दारात





