पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा'च्या दुसऱ्या भागात साधला संवाद
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
परीक्षा पे चर्चा 2026 मध्ये नरेंद्र मोदी यांनी कोईम्बतूर, रायपूर, देवमोगरा, गुवाहाटी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान, पर्यावरण, नेतृत्व, आत्मविश्वास यावर मार्गदर्शन दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा 2026 च्या 9 व्या आवृत्तीला पुढे सुरू ठेवत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात पंतप्रधानांनी कोईम्बतूर, रायपूर, देवमोगरा आणि गुवाहाटी येथील ‘एक्झॅम वॉरियर्स’शी अनौपचारिक संवाद साधला. ‘परीक्षा पे चर्चा’च्या या विशेष आवृत्तीत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना श्री मोदी यांनी नमूद केले की, यावेळी हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांत आयोजित करण्यात आला आहे. कोईम्बतूर आवृत्तीची सुरुवात करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांमधील ऊर्जा आणि कुतूहलाने ते मनापासून प्रभावित झाले आहेत. “वणक्कम” म्हणून त्यांचे स्वागत करत त्यांनी हलकाफुलका संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता जेव्हा त्यांनी पंतप्रधानांना पाहिले; त्यांना वाटले होते की पंतप्रधानांचे आगमन खूप नाट्यमय असेल, परंतु त्यांना ते अत्यंत साधे, नम्र आणि जमिनीशी नाते असलेले वाटले. एका विद्यार्थ्याने आपला अनुभव सांगताना म्हटले की, पंतप्रधानांच्या आगमनाच्या वेळी त्यांना कमालीचे दडपण आल्यासारखे वाटत होते.
स्टार्ट अप्स आणि पंतप्रधानांचा अभ्यासाचा मंत्र
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, अनेक वर्षांपासून ते ‘परीक्षा पे चर्चा’च्या माध्यमातून 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी यावर भर दिला की, हा त्यांच्यासाठी शिकण्याचा कार्यक्रम आहे, शिकवण्याचा नाही आणि त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे विचार मांडण्याचे आवाहन केले. स्टार्टअप्सबद्दलच्या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नमूद केले की, सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आहे यावर लक्ष असावे, मग ते तंत्रज्ञानातील नाविन्य असो किंवा ड्रोन किंवा वीज यंत्रणेसारखे व्यावहारिक उपाय असोत. त्यांनी तंत्रज्ञान किंवा आर्थिक क्षेत्रात कुशल असलेल्या मित्रांसोबत लहान संघ तयार करण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्पष्ट केले की, एखादा उपक्रम सुरू करण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते आणि अगदी लहान स्टार्टअप्स देखील प्रभावी ठरू शकतात. त्यांनी नमूद केले की, जर खरी आवड असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे. त्यांनी अस्तित्वात असलेल्या स्टार्टअप्सना भेट देण्याचा, प्रकल्प अहवाल तयार करण्याचा आणि तो शालेय प्रकल्प म्हणून प्रामाणिकपणे सादर करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळण्यास प्रोत्साहन मिळेल. हळूहळू पुढे कसे जायचे याचे मौल्यवान ज्ञान त्यांना प्राप्त होईल, असा निष्कर्ष त्यांनी काढला.
advertisement
अभ्यास आणि छंद यांचा समतोल राखण्याबाबतच्या दुसऱ्या एका विद्यार्थ्याच्या शंकेचे निरसन करताना, मोदी यांनी अधोरेखित केले की दोन्ही गोष्टी उपयुक्त आहेत आणि त्या एकमेकांना पूरक ठरू शकतात. विज्ञान प्रयोगांसोबत कलेचा मेळ घालण्याचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, सर्जनशीलता शिकण्यास मदत करू शकते आणि थकवा कमी करू शकते. शिक्षण हे प्राधान्य राहील याची खात्री करत त्यांनी दैनंदिन किंवा साप्ताहिक वेळ स्वतःच्या आवडीनिवडींसाठी देण्याची शिफारस केली.
advertisement
विकसित भारत आणि व्होकल फॉर लोकलमध्ये युवा वर्गाचे योगदान
2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनण्याबाबत एका विद्यार्थ्याने विचारले असता, पंतप्रधानांनी लहान विद्यार्थी देखील हे स्वप्न पाहत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सिंगापूरचे एका मासेमारी करणाऱ्या खेड्यातून झालेल्या परिवर्तनाचा उल्लेख केला आणि विकसित राष्ट्रांच्या शिस्तबद्ध सवयी अंगीकारण्यावर ली कुआन यू यांनी दिलेल्या भराचा दाखला दिला. त्यांनी नमूद केले की कचरा न टाकणे, वाहतुकीचे नियम पाळणे, अन्नाची नासाडी टाळणे आणि स्थानिक उत्पादनांना पाठिंबा देणे यांसारखी छोटी पावले राष्ट्रीय प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्यांनी “व्होकल फॉर लोकल” असण्यावर आणि परदेशाऐवजी भारतात लग्नकार्यासारखे कार्यक्रम साजरे करण्याचे महत्त्व सांगण्यावर भर दिला, तसेच प्रत्येक नागरिकाच्या छोट्या कृती एकत्रितपणे विकसित भारत घडवण्यास मदत करतात यावरही भर दिला. त्यांनी मोठ्या पावलांपेक्षा छोट्या पावलांवर अधिक भर दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि त्यामुळे या लहान लहान गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत हे अधोरेखित झाले.
advertisement
प्रेरणा की शिस्त?
यशस्वी होण्यासाठी प्रेरणा महत्त्वाची आहे की शिस्त, या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवनात या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, असे नमूद केले.
शिस्तीशिवाय केवळ प्रेरणा ही फारशी उपयुक्त नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एक शेतकरी आपल्या शेजाऱ्याच्या यशाने प्रेरित होतो, परंतु पावसापूर्वी आपले शेत नांगरून ठेवत नाही, त्यामुळे त्याला चांगले पीक मिळत नाही,असे एका शेतकऱ्याचे उदाहरण देऊन त्यांनी सांगितले.शिस्त अपरिहार्य आहे, तर प्रेरणा ही ” सोन्याच्या अलंकारासारखी” मूल्य वाढवते आणि शिस्तीशिवाय प्रेरणा हे ओझे बनते आणि निराशा निर्माण करते,त्यासाठी देखील एक उदाहरण,त्यांनी दिले.वर्षानुवर्षे त्रास होत असलेल्या एका प्रश्नावर स्पष्ट उत्तर मिळाल्याबद्दल एका विद्यार्थ्याने सन्मानित झाल्याची भावना व्यक्त केली.
advertisement
कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय आणि त्याचा योग्य वापर
कृत्रिम बुद्धिमत्तेवरील दुसऱ्या एका प्रश्नावर बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की प्रत्येक युगाला नवीन तंत्रज्ञानाची चिंता भेडसावत असते, मग ते संगणक असो वा मोबाईल फोन, परंतु ही भीती अनावश्यक आहे. तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचे मालक होऊ नये यावर त्यांनी भर दिला, उपकरणांचे गुलाम होण्यापासून त्यांनी विद्यार्थ्यांना सावध केले. त्यांनी ठामपणे सांगितले, “मी गुलाम होणार नाही,” आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मार्गदर्शन आणि मूल्यवर्धनासाठी केला पाहिजे, शिक्षणाचा पर्याय म्हणून नाही असा सल्ला त्यांनी दिला. ज्याप्रमाणे वाहतूकीत बैलगाड्यांपासून ते विमानांपर्यंत असे बदल झाले जाते, तसेच नोकरीचे स्वरूप नेहमीच विकसित होत राहील,परंतु जीवन चालूच राहते, असे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञान समजून घेणे, स्वतःच्या क्षमतांचा विस्तार करणे आणि तंत्रज्ञानाच्या ताकदींना कामात समाविष्ट करणे यामुळे भीतीशिवाय प्रगती सुनिश्चित होते यावर त्यांनी भर दिला.
advertisement
विकसित भारताचा संकल्प
पंतप्रधान हे एका नेत्यापेक्षा कुटुंबातील सदस्य असल्यासारखे वाटले, त्यांच्यामुळे भारावून गेल्यासारखे झाले,तसेच सन्मानित झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या,. कोइम्बतूरमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले,की कोइम्बतूरचे तरुण एआय, स्टार्टअप्स आणि भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल अत्यंत जागरूक आहेत आणि हे भारताच्या युवा विचारसरणीचे प्रतिबिंब आहे, जे 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पाला नवीन बळ देत राहील
advertisement
परीक्षा पे चर्चा’ही संवाद आणि परस्पर शिक्षणाची भावना पुढे अधोरेखित करत, ही चर्चा नंतर कोइम्बतूरहून रायपूर, छत्तीसगड येथेही झली, जिथे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला आणि स्थानिक पदार्थांचा आस्वादही घेतला.
प्रवास आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी पंतप्रधानांचे मार्गदर्शन
“जय जोहार” असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले, अन्न परंपरा आणि स्थानिक स्वादिष्ट पदार्थांबद्दलची माहिती विचारली. त्यानंतर त्यांनी प्रश्नांना सुरुवात केली. सुट्टीतील प्रवासाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांना पुढील प्रवासाअगोदर प्रथम स्वतःचा तालुका, जिल्हा आणि राज्य यांचे अन्वेषण करण्याचा सल्ला त्यांनी दिला. विद्यार्थी म्हणून ट्रेनने प्रवास करताना, खाद्यपदार्थ घेऊन जाताना आणि भारतातील विविधतेतून शिकताना पर्यटन सर्वात आनंददायी होईल यावर पंतप्रधानांनी भर दिला.
परीक्षेचा ताण आणि पुनरावृत्ती या प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नावर, मोदी यांनी सांगितले,की विद्यार्थ्यांनी त्यांच्या तयारीवर विश्वास ठेवावा, शांत राहावे आणि विषयांवर प्रभुत्व मिळवावे.सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि स्पर्धा हे सामर्थ्य निर्माण करतात, असे त्यांनी शिक्षणाची तुलना खेळाशी करत सांगितले हे लक्षात घेऊन अभ्यासासाठी कष्ट घेणाऱ्यांशी मैत्री करण्याचे आणि त्यांना शिकण्यास मदत करण्याचे तसेच मैत्रीचे व्यावहारिक तंत्र त्यांनी सुचवले.
अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधणे
खेळ आणि अभ्यास यांचा समतोल साधण्याची इच्छा असलेल्या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधानांनी सांगितले की शिक्षण हे केवळ वैयक्तिक जीवनासाठीच नाही तर सामाजिक जीवनासाठी देखील आवश्यक आहे आणि त्याला कधीही कमी लेखू नये. केवळ खेळातील उत्कृष्ट कामगिरीमुळे अभ्यासाची गरज नाहीशी होते असे मानण्याची चूक न करण्याचा त्यांनी इशारा दिला, तसेच केवळ शिक्षण म्हणजेच सर्वस्व असे नाही हे देखील स्पष्ट केले. प्रतिभा विकसित केली पाहिजे यावर त्यांनी भर दिला आणि खेळाडू बनण्यासाठी खेळ आवश्यक असला तरी, जीवनाला खेळ समजणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जीवनात संतुलित राहण्यासाठी खेळाचा समावेश असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. “जर आपण खेळलो तर भरभराटीला येतो.” अभ्यास देखील केला पाहिजे, जेणेकरून इतर लोक त्याला अभ्यास न करता केवळ मैदानावर असतो असे म्हणून नाकारू नयेत, असे त्यांनी अधोरेखित केले. खरी ताकद शैक्षणिक आणि क्रीडा दोन्ही क्षेत्रात शक्तिमान असण्यात आहे,असा निष्कर्ष त्यांनी काढला. पंतप्रधानांच्या सल्ल्याची अंमलबजावणी विद्यार्थी आयुष्यात करतील असे विद्यार्थ्यांनी सांगितले आणि मिळालेल्या अनुभवाबद्दल प्रचंड कृतज्ञता व्यक्त केली.
पर्यावरणाचे संरक्षण
पर्यावरण संरक्षणात योगदान देण्याबाबत एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे आपल्या प्रवृत्तीचा भाग बनले पाहिजे. दैनंदिन जीवनातील छोटे छोटे नियम मोठे बदल घडवून आणतात, यावर त्यांनी भर दिला.त्यांनी ब्रश करताना पाणी बंद करण्याचे आणि गरजेनुसारच वापरण्याचे उदाहरण दिले. त्यांनी एका शिक्षकाची प्रेरणादायी कहाणी सांगितली ज्याने पेट्रोल पंपांवरून तेलाचे डबे गोळा केले आणि मुलांना त्यांच्या घरातील उरलेले पाणी बाटल्यांमध्ये आणण्यास सांगितले, ते पाणी नंतर झाडांना पाणी घालण्यासाठी वापरले जात असे. भाज्यांचे तुकडे खत म्हणून काम करत असल्याने, संपूर्ण शाळा हिरवीगार झाली, एका शिक्षकाच्या पुढाकाराने पर्यावरण कसे बदलले हे दाखवून दिले. मानवी वर्तन अशा बदलाची सुरुवात करू शकते आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी लहान, साध्या कृती पुरेशा आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.
नेतृत्वाविषयी अंतर्दृष्टी
नेते म्हणून भावी पिढीकडून कोणते गुण अपेक्षित आहेत असे विचारले असता, पंतप्रधानांनी सांगितले की पहिला गुण म्हणजे निर्भय असणे. नेतृत्वाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा एखादी व्यक्ती इतरांची वाट न पाहता कृती करण्याचा निर्णय घेते,असा सल्ला त्यांनी दिला.कचरा उचलण्याचे उदाहरण देऊन त्यांनी इतरांना त्यांचे अनुसरण करण्यास प्रेरित केले.
नेतृत्व हे केवळ निवडणुका किंवा भाषणे देणे यापुरते मर्यादित नसून इतरांना समजावून सांगण्याची आणि त्यांना पटवून देण्याची क्षमता आहे हे त्यांनी स्पष्ट केले. खरे नेते लोकांना मार्गदर्शन करण्यापूर्वी त्यांना समजून घेतात यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थ्यांनी आपला आनंद व्यक्त करताना हा अनुभव स्वप्नवत असल्याचे सांगितले आणि पंतप्रधानांना भेटणे हे भाग्य आणि सन्मान असल्याचे नमूद केले .
रायपूरमधील संवाद संपवताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की परीक्षेची तयारी, तणाव आणि अपेक्षा हे ‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये वारंवार येणारे विषय आहेत आणि या कार्यक्रमाचा उद्देश तरुणांना या समस्यांवर मोकळेपणाने चर्चा करण्याची संधी देणे हा आहे. या चर्चा केवळ बोर्ड परीक्षेच्या तयारीपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श करतात, यावर त्यांनी भर दिला. या चर्चेतून तरुण मनातील विचार प्रतिबिंबित होतात, असे ते म्हणाले. या संवादाचा पुढील भाग गुजरातमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी आपण खरोखरच आश्चर्यचकित झालो असे ते म्हणाले. .
गुजरातच्या देवमोगरा येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल विचारपूस केली, त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले आणि पूर्वीच्या भेटींमधील काही परिचित चेहऱ्यांना ओळखले, तसेच त्यांच्या धैर्याचे कौतुक केले.
गुजरातमधील आदिवासी भागांचा विकास
आदिवासी भागात काम करण्याची प्रेरणा कुठून मिळाली या प्रश्नाला उत्तर देताना, मोदींनी पालचेतरिया येथील ऐतिहासिक घटनेची आठवण करून दिली, जिथे आदिवासी समाजाने स्वातंत्र्यासाठी मोठा लढा दिला होता. तसेच पंतप्रधानांनी त्या भीषण दुष्काळाची आठवण करून दिली, ज्या दरम्यान ते या प्रदेशात राहिले होते आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांना जाणवली होती. त्यांनी सांगितले की जेव्हा ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. एकेकाळी उमरगाम ते अंबाजीपर्यंत विज्ञान शिकवणारी एकही शाळा नव्हती, परंतु आता विद्यापीठे, विज्ञान शाळा, अभियांत्रिकी संस्था आणि आयटीआय आहेत, ज्यामुळे महत्त्वपूर्ण बदल आणि फायदे झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. विकासात अजूनही मागे असलेल्या आदिवासी समुदायांना पाठबळ देण्यासाठी स्वतंत्र योजना आणि अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. याच उद्देशाने पीएम जनमन योजना तयार केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आणि स्पष्ट केले. शिक्षणामुळे विकासाला गती मिळते, हे त्यांनी अधोरेखित केले. उमरगाम-अंबाजी महामार्गासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रगतीसाठी संपर्क व्यवस्था महत्त्वपूर्ण आहे आणि ती नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे, असे त्यांनी नमूद केले.
पहलगाम हल्ल्यानंतरची परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूर यांसारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय क्षणी तणावाचे व्यवस्थापन कसे केले याबद्दल एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना अनेकदा परीक्षेचा ताण येतो, परंतु परीक्षा संपल्यावर तो तात्पुरता होता हे त्यांच्या लक्षात येते. परीक्षेचा ताण कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे केवळ वाचन करण्याऐवजी नियमितपणे प्रश्नपत्रिका सोडवण्याची आणि लिहिण्याची सवय लावणे आहे यावर त्यांनी भर दिला. सातत्यपूर्ण सरावामुळे तणाव टाळता येतो, असेही ते म्हणाले. हास्याचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, योग्य झोपेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पुरेशी विश्रांती घेतल्याने मन ताजेतवाने राहते, नवीन कल्पना सुचतात आणि उत्साह टिकून राहतो, असे ते म्हणाले.
योग्य करिअरचा मार्ग
करिअरच्या निवडीबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी सल्ला दिला की सतत बदलणाऱ्या आकांक्षांमुळे कुटुंबात संभ्रम निर्माण होतो, परंतु यशस्वी लोकांकडून प्रेरणा मिळणे स्वाभाविक आहे. मात्र त्यांच्या यशाकडेच नव्हे तर त्यामागील परिश्रम आणि शिस्तीकडे हे पाहणे आवश्यक आहे असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी एका क्रिकेटपटूचे उदाहरण दिले, जो पहाटे 4 वाजता उठून सरावासाठी सायकलवरून जातो. त्यांनी सांगितले की कठोर परिश्रम आणि नियमित दिनचर्येला स्वप्नांची जोड दिली पाहिजे. खरे यश स्वतःच आपली ओळख निर्माण करते, आणि जेव्हा एखादी व्यक्ती अव्वल बनते, तेव्हा संपूर्ण शाळा, गाव आणि समाज त्याची दखल घेतो, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी वारली, लिपन आणि पिथोरा कलेसह विविध सांस्कृतिक कलाकृती सादर केल्या आणि त्यांच्या परंपरांबद्दल माहिती दिली. पंतप्रधानांनी त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले, त्या हाताने बनवल्या आहेत का असे विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले, “तुम्ही एक महान कलाकार झाला आहात.” चित्रांची भेट मिळाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी त्यांमधील सांस्कृतिक गाभ्याची आणि सर्जनशीलतेची नोंद घेतली. विद्यार्थ्यांनी आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की जणू काही ते आपल्या मित्राशी बोलत आहेत असे त्यांना वाटले, आणि पंतप्रधानांनी त्यांच्या कामाचे वैयक्तिकरित्या कौतुक केल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.
शिक्षकांची भूमिका आणि आदिवासी तरुण
आपल्या आयुष्यात शिक्षकांच्या भूमिकेबद्दल एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, शिक्षकांनी त्यांच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी आठवण करून दिली की, त्यांचे शिक्षक त्यांना दररोज ग्रंथालयात जाण्यासाठी, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’मधील संपादकीय वाचण्यासाठी, ते लिहून काढण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी त्यावर चर्चा करण्यासाठी कसे प्रोत्साहित करत असत. यामुळेच त्यांच्यात शिस्त आणि जिज्ञासा निर्माण झाली, असे ते म्हणाले. त्यांनी आपल्या प्राथमिक शाळेतील परमार सरांच्या आठवणी सांगितल्या. हे शिक्षक शारीरिक तंदुरुस्तीवर भर देत असत तसेच आपल्याला ते योग आणि मल्लखांब शिकवत असत. यामुळे व्यावसायिक खेळाडू न बनताही त्यांना आरोग्याचे महत्त्व समजले, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात दोन प्रभावांचा नेहमीच स्वीकार केला जातो – त्यांची आई आणि त्यांचे शिक्षक, यावर त्यांनी भर दिला.
भारताच्या प्रगतीमध्ये आदिवासी समाजाच्या योगदानाबद्दल विचारले असता, पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांच्यामुळेच देशाने लक्षणीय प्रगती केली आहे. आदिवासी समाजाच्या निसर्गावरील भक्तीमुळेच भारताचे पर्यावरण जपले गेले आहे, कारण ते निसर्गाची पूजा करतात आणि त्याचे संरक्षण करतात, असे पंतप्रधान म्हणाले. आदिवासी समाजातील मुले आणि मुली मोठ्या संख्येने सशस्त्र दलात सेवा देत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही क्षेत्रात संधींच्या बाबतीत कोणताही भेदभाव असता कामा नये, हे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की आदिवासी युवक क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. मध्यप्रदेशातील आदिवासी कन्या क्रांती गौड हिचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की तिने क्रिकेटमध्ये देशाची मान उंचावली असून अशा अनेक आदिवासी खेळाडूंनी राष्ट्राला गौरव प्राप्त करून दिला आहे. आदिवासी समाजाकडे प्रचंड प्रतिभा असून त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास त्यांची क्षमता अधिक वाढेल, असे त्यांनी नमूद केले. केवळ नोकरीसाठी नव्हे, तर अर्थपूर्ण आयुष्य घडविण्याच्या स्वप्नांसह जगले पाहिजे, तेव्हाच खरे समाधान मिळते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेले मोगी माता यांच्यावर आधारित सामूहिक गीत ऐकले. त्या गीतात मोगी माता कुठे राहतात आणि कशा प्रकारे जीवन जगतात याचे सुंदर वर्णन होते. विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांच्या संवादात जीवनात आनंदी कसे राहावे, ताणतणाव कसा दूर करावा, वेळेचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि न घाबरता परीक्षेची तयारी कशी करावी या विषयांवर चर्चा झाली. प्रत्यक्ष पंतप्रधानांना भेटल्याचे त्यांना स्वप्नासारखे वाटत होते आणि संवादादरम्यान वेळ कसा गेला हेही कळले नाही, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की परीक्षा पे चर्चा हा प्रवास अष्टलक्ष्मी प्रदेशात, म्हणजेच ईशान्य भारतात, ब्रह्मपुत्रेच्या काठावर गुवाहाटी येथे पोहोचला. त्यांचे स्वागत पारंपरिक गामोसा देऊन करण्यात आले, जे आसाममध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांची उपस्थिती मनाला शांतता देणारी होती आणि त्यामुळे त्यांची भीती कमी झाली. पंतप्रधानांनी विचारले की त्यांनी हा कार्यक्रम दूरदर्शनवर पाहिला आहे का किंवा “एग्झाम वॉरियर” हे पुस्तक वाचले आहे का. विद्यार्थ्यांनी याचे उत्तर देताना सांगितले की त्यामुळे त्यांची परीक्षेची भीती कमी झाली असून परीक्षेकडे उत्सव म्हणून पाहण्याची दृष्टी मिळाली. अनेकदा कुटुंबातील सदस्यच गेलेल्या गुणांबाबत प्रश्न विचारून भीती निर्माण करतात, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. समाधान हे प्रगतीला अडथळा ठरू नये, असे सांगून त्यांनी पुन्हा अधोरेखित केले की स्पर्धा इतरांशी नव्हे, तर स्वतःशी असावी आणि आत्मविकास सतत सुरू राहिला पाहिजे.
आरोग्यदायी आहार आणि जीवनशैली
आहार आणि जीवनशैलीविषयी प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधानांनी सांगितले की ते कोणतीही ठरावीक पद्धत पाळत नाहीत. विविध घरांमध्ये शाकाहारी भोजन जेवल्याचे दिवस त्यांनी आठवले तसेच स्वतः खिचडीसारखे साधे अन्न बनवण्याचा अनुभवही सांगितला. आहार वैयक्तिक आवडीनुसार असावा, औषधासारखा नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण पोट भरण्यासाठी खातो की मन तृप्त करण्यासाठी, याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. धान्य खाऊन पोट भरले जाते, परंतु खोल श्वास घेऊन छाती फुलवण्याकडे लोक दुर्लक्ष करतात याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि उलट पद्धतीने विचार करण्याचा सल्ला दिला. शरीराला प्राधान्य द्यावे, सूर्योदय पाहण्यासारख्या सवयी अंगीकाराव्यात आणि आरोग्याला सर्वोच्च स्थान द्यावे, कारण त्यामुळे ताजेपणा व ऊर्जा मिळते, असे त्यांनी सांगितले.
तुलनेचे दडपण हाताळणे
आई-वडील भावंडांशी किंवा मित्रांशी तुलना करतात या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधानांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला. पालकांनी भावंडाच्या सुंदर हस्ताक्षराचे कौतुक केल्यास रागावण्याऐवजी त्या भावंडाकडून शिकण्याची विनंती करावी, असे त्यांनी सांगितले. भावंडांच्या गुणांमधून शिकावे आणि पालकांना म्हणावे, “तुम्ही एक चांगला गुण दाखवला आहे, आता तो विकसित कसा करायचा ते मला सांगा.” पालकांनी एका मुलाचे अति कौतुक इतरांसमोर करू नये, कारण त्यामुळे असमतोल निर्माण होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याजवळील व्यक्ती एखाद्या क्षेत्रात उत्कृष्ट असल्यास तिला मनात गुरु मानावे आणि मार्गदर्शन मागावे, असे त्यांनी सांगितले.
स्वतःवर विश्वास
मंचाची भीती आणि आत्मविश्वासाबाबत पंतप्रधानांनी सांगितले की आत्मविश्वास हा “आत्मा” आणि “विश्वास” या दोन शब्दांपासून बनतो, म्हणजे स्वतःवर विश्वास. जे स्वतःवर विश्वास ठेवतात ते कधीही घाबरत नाहीत आणि परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घेतात. स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषणाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की सुरुवातीला तेही थोडे घाबरले होते, परंतु सरस्वती मातेकडे प्रार्थना केल्यानंतर त्यांनी “सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका” असे उच्चारताच प्रेक्षकांनी अनेक मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला. हा त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा क्षण ठरला. महान वक्ते आणि खेळाडूही अपयशाला सामोरे जातात, सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाल्याची उदाहरणे देत त्यांनी सांगितले, परंतु ते आत्मविश्वास कधीही गमावत नाहीत. परिस्थितीचे निरीक्षण करावे, आव्हाने स्वीकारावीत आणि अंतर्मनातील शक्तीवर विश्वास ठेवावा, असा संदेश त्यांनी दिला.
यानंतर विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांचे गीत सादर केले, ज्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. एका विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबाचा चहा मळ्यांशी असलेला संबंध सांगून त्यांना चहाची पाने भेट दिली. पंतप्रधानांनी तिच्या आईचे आभार मानले . विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांना भेटून आनंद झाला , पिढीतील अंतर असूनही आम्हाला समजून घेतले गेले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
समारोप करताना पंतप्रधानांनी सांगितले की परीक्षा पे चर्चा मध्ये केवळ परीक्षांवरील चर्चा नव्हे, तर स्थानिक संगीत आणि आसामचा चहाही समाविष्ट होता, ज्यामुळे हा अनुभव संस्मरणीय ठरला. परीक्षा ही एक संधी असून निकोप स्पर्धेमुळे तयारी अधिक चांगली होते, असे त्यांनी स्पष्ट केले. ठिकाणे, विद्यार्थी आणि अनुभव वेगवेगळे असले तरी प्रत्येक संवादाचा उद्देश एकच आहे. तो म्हणजे ऐकणे, समजून घेणे आणि एकत्र शिकणे…..असे सांगत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 9:00 PM IST
मराठी बातम्या/देश/
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा'च्या दुसऱ्या भागात साधला संवाद









