बारामतीत नीरा नदीत मृत्यूचा थरार! अचानक नदीकाठी लाखो मृत माशांचा खच, आसपासच्या गावातील लोक भयभीत
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नदी पात्रात प्रक्रिया न केलेले रसाययुक्त पाणी सोडल्याने लाखो माशांचा मृत्यू झाला आहे.
(जितेंद्र जाधव, प्रतिनिधी) बारामती : पुणे आणि सातारा जिल्ह्यांची जीवनवाहिनी असलेल्या नीरा नदीचे पाणी कमालीचे दूषित झाले आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नदी पात्रात प्रक्रिया न केलेले रसाययुक्त पाणी सोडल्याने लाखो माशांचा मृत्यू झाला आहे. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथे नदीकाठी मृत माशांचा खच पडल्याचं दिसून आलं. या भीषण घटनेमुळे नदीची जैवविविधता धोक्यात आली आहे.
नदीकाठी दुर्गंधीचे साम्राज्य
कोऱ्हाळे बुद्रुक आणि परिसरातील गावांमध्ये मृत माशांमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या भयंकर वासामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
सोमेश्वर कारखान्यावर कारवाईची मागणी
नदीत रसायनयुक्त पाणी सोडून जलचरांचा बळी घेणाऱ्या सोमेश्वर कारखान्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) या घटनेची तातडीने दखल घेऊन कारखान्याला नोटीस बजावावी आणि गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
advertisement
नीरा नदीतील मासे हे केवळ जैवविविधतेचा भाग नसून, त्यावर अनेक स्थानिक मच्छिमार कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, कारखान्याच्या या हलगर्जीपणामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडल्याने मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेने नदीतील संपूर्ण परिसंस्था कोलमडली आहे.
स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ आता या गंभीर प्रकरणावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 10:23 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
बारामतीत नीरा नदीत मृत्यूचा थरार! अचानक नदीकाठी लाखो मृत माशांचा खच, आसपासच्या गावातील लोक भयभीत







