कृषी हवामान : ऑक्टोबरमध्ये पुन्हा मोठं संकट! शेतकऱ्यांची चिंता वाढली, हवामान विभागाच्या अंदाजाने खळबळ
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत.
मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. मात्र हे संकट अजूनही टळलेले नाही. हवामान विभागाने (IMD) ऑक्टोबर महिन्यातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा तब्बल 115% अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाऊस सप्टेंबरपुरता मर्यादित न राहण्याची शक्यता
सामान्यतः भारतात मान्सूनचा मोसम सप्टेंबर अखेरीस संपतो. परंतु यंदा मान्सून लांबला असून ऑक्टोबरमध्येही पावसाचा जोर कायम राहील, असे संकेत आहेत. महापात्रा म्हणाले, "सप्टेंबरमध्ये आधीच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आता ऑक्टोबरमध्येही 50 वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत 115% पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे." या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता दुप्पट झाली आहे.
advertisement
पावसाच्या वाढीमागची कारणे
हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातून निर्माण होणारे ओलसर वारे उत्तरेकडे व पश्चिमेकडे सरकतात. हे वारे उत्तर भारतातील थंड वाऱ्यांशी आणि पश्चिमेकडील विक्षोभांशी टक्कर घेतात, तेव्हा मुसळधार पावसाची स्थिती तयार होते. यंदा अशी परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याने ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील असामान्य बदल हे देखील या पावसाला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
advertisement
शेतकऱ्यांसाठी नवा धोका
सप्टेंबरमधील मुसळधार पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. काही शेतकऱ्यांची पिके अजून शाबूत असली तरी ऑक्टोबरमधील मुसळधार पावसामुळे त्यांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेषतः भात, मका आणि सोयाबीन या पिकांची काढणी साधारणतः ऑक्टोबरमध्ये केली जाते. मात्र या काळात जर मुसळधार पाऊस झाला तर या पिकांची काढणी थांबू शकते तसेच उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
पिकांवर रोगराईचा धोका
अतिरेकी पावसामुळे शेतजमिनींमध्ये पाणी साचल्यास पिकांवर विविध रोगराई वाढू शकते. भात आणि सोयाबीनसारख्या पिकांवर कीड व बुरशीजन्य आजारांचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर व त्यांच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे.
शहरी भागातही अडचणी
फक्त ग्रामीण भागच नव्हे तर शहरी भागातही मुसळधार पावसाचा फटका बसू शकतो. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे, घरांमध्ये पाणी शिरणे अशा समस्या पुन्हा एकदा उद्भवू शकतात. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी ऑक्टोबर महिना आव्हानात्मक ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 10:59 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : ऑक्टोबरमध्ये पुन्हा मोठं संकट! शेतकऱ्यांची चिंता वाढली, हवामान विभागाच्या अंदाजाने खळबळ