शेतकऱ्यांसाठी केंद्र अन् राज्य सरकारचा मोठा निर्णय! घरबसल्या पीक कर्ज मिळणार,अर्ज कुठे करायचा?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Crop Loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यात महत्त्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे.
अकोला : शेतकऱ्यांना पीक कर्ज जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यात महत्त्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. या कराराअंतर्गत शेतकऱ्यांना घरबसल्या पीक कर्ज मंजुरी मिळावी यासाठी जनसमर्थ पोर्टलद्वारे किसान क्रेडिट कार्ड (KCC) व पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात ही मोहीम 31 ऑगस्ट 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
घरबसल्या पीक कर्ज मंजुरी
आतापर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. अनेकदा कागदपत्रांच्या चक्रव्यूहात शेतकऱ्यांना विलंब आणि अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता फक्त मोबाईलवरील काही क्लिकद्वारे शेतकरी घरबसल्या पीक कर्जासाठी अर्ज करू शकतात. या नव्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
कर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन
या मोहिमेत अॅग्रिस्टॅक डेटा प्रणालीचे जनसमर्थ पोर्टलशी एकात्मिकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, कागदपत्रविरहित आणि पारदर्शक झाली आहे. शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी अॅग्रिस्टॅक (Farm Registry) मध्ये नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. या टप्प्यावर ही सुविधा केवळ स्वतःच्या नावावर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध आहे.
advertisement
अर्ज कसा करावा?
शेतकऱ्यांनी www.jansamarth.in या संकेतस्थळावर जाऊन मोबाइल क्रमांक वापरून नोंदणी करावी. नंतर Agri Loan – Kisan Credit Card हा पर्याय निवडावा. जिल्ह्याचे नाव व आधार क्रमांक भरून ई-केवायसी तपासणी करावी. त्यानंतर वैयक्तिक, बँक, आर्थिक व जमिनीचे तपशील भरून अर्ज सादर करावा. शासन व बँकांच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज मंजूर होईल.
advertisement
शेतकऱ्यांना होणारे फायदे
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी वेळेची बचत होईल, बँकांच्या चकरा टाळल्या जातील आणि प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील. शिवाय, डिजिटल प्रणालीमुळे अर्ज, तपासणी व मंजुरीची सर्व माहिती शेतकऱ्यांना थेट मोबाईलवर मिळेल.
केंद्र व राज्य सरकारच्या या संयुक्त प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज सहज आणि जलद मिळणार आहे. पारदर्शक व कागदपत्रविरहित प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि खरीप हंगामासाठी निधी वेळेत उपलब्ध होईल. अकोला जिल्ह्यात सुरू झालेली ही मोहीम यशस्वी ठरल्यास पुढील काळात राज्यभर विस्तारली जाऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2025 8:37 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांसाठी केंद्र अन् राज्य सरकारचा मोठा निर्णय! घरबसल्या पीक कर्ज मिळणार,अर्ज कुठे करायचा?