रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या पेट्या पाहिल्या अन् डोक्यात आली आयडिया, नाशिकचा शेतकरी आता झाला करोडपती
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : बहुतांश लोक मधमाश्यांचा भुणभुणता आवाज ऐकताच घाबरून दूर पळतात. मात्र नाशिकमधील गजानन भालेराव यांच्यासाठी हा आवाज भीतीचा नसून संधीचा आहे.
मुंबई : अनेक लोक मधमाश्यांचा भुणभुणता आवाज ऐकताच घाबरून दूर पळतात. मात्र नाशिकमधील गजानन भालेराव यांच्यासाठी हा आवाज भीतीचा नसून संधीचा आहे. गेली तब्बल १८ वर्षे ते मधमाशी पालनाच्या व्यवसायात सक्रिय असून, या अनोख्या क्षेत्रातून त्यांनी केवळ स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहच केला नाही, तर देशभरातील हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
शेतकरी कुटुंबातून उद्योजकतेकडे वाटचाल
हिंगोली जिल्ह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गजानन भालेराव यांनी लहानपणापासूनच शेतीतील कष्ट अनुभवले. रोजगाराच्या शोधात ते नाशिकमध्ये आले आणि इथेच त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. आज ‘किसान मधुमक्षिका फार्म्स’ या नावाने ओळखला जाणारा त्यांचा व्यवसाय देशातील अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांची पत्नी माधुरी भालेराव त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. मध काढणे, प्रक्रिया करणे, पॅकिंग आणि विक्रीपर्यंत सर्व जबाबदाऱ्या त्या समर्थपणे सांभाळतात.
advertisement
पिकांनुसार स्थलांतर करणारा अनोखा व्यवसाय
भालेराव दाम्पत्याचा व्यवसाय एका ठिकाणी स्थिर नसून तो शेतीच्या हंगामानुसार सतत फिरता असतो. त्यांच्या ट्रकमध्ये नेहमीच ५०० हून अधिक मधमाश्यांच्या पेट्या, तंबू, आवश्यक साधने आणि दैनंदिन वापराचे साहित्य सज्ज असते. सध्या ते नाशिकच्या मालेगाव परिसरात बाजरीच्या शेतांमध्ये मधमाश्यांच्या पेट्या ठेवून काम करत आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील डाळिंब व पेरूच्या बागा, तर पुढे राजस्थानातील सेलरी आणि हिवाळ्यात राजस्थान व उत्तर प्रदेशातील मोहरीच्या विस्तीर्ण शेतांमध्ये त्यांचा मुक्काम असतो.
advertisement
गजानन भालेराव सांगतात, “मधमाश्यांमुळे नैसर्गिक परागीकरण वाढतं आणि त्यामुळे शेतमालाचं उत्पादन किमान ४० ते ५० टक्क्यांनी वाढतं. हा फायदा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.”
2007 मध्ये घेतलेला निर्णायक निर्णय
गजानन यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती वयाच्या १६व्या वर्षी. ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत असताना ते राजस्थानमध्ये गेले होते. तेथे रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या मधमाश्यांच्या पेट्यांनी त्यांचे लक्ष वेधले. याच अनुभवातून मधमाशी पालनाची कल्पना मनात रुजली. पुढे त्यांनी खादी व ग्रामोद्योग आयोग तसेच पुण्यातील केंद्रीय मधमाशी संशोधन संस्थेतून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आणि २००७ मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
हजारो शेतकऱ्यांना थेट लाभ
गेल्या १८ वर्षांत भालेराव दाम्पत्याने ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना परागीकरणाच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला आहे. नाशिकमधील शेतकरी नीलेश पवार सांगतात, “भालेराव यांच्या मधमाश्यांमुळेच आमच्या डाळिंब उत्पादनात वाढ झाली आणि निर्यात शक्य झाली.”
कष्ट, शिस्त आणि पर्यावरणपूरक दृष्टी
सध्या भालेराव यांच्याकडे सुमारे १००० मधमाश्यांच्या पेट्या असून, प्रत्येक पेटीत १४ ते १६ हजार मधमाश्या असतात. या मधमाश्या दररोज ११ तासांहून अधिक काम करतात. ही शिस्त आणि मेहनतच आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे गजानन सांगतात. “मधमाशी पालन हा केवळ नफ्याचा व्यवसाय नाही, तर पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी मार्ग आहे,” असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 7:28 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या पेट्या पाहिल्या अन् डोक्यात आली आयडिया, नाशिकचा शेतकरी आता झाला करोडपती








