मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच, वाहतूक व्यवस्थेवर परिणाम
रविवारी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने दुपारनंतर जोरदार हजेरी लावली होती. आज सकाळपासूनही आकाशात ढग दाटून आले असून, वातावरण प्रचंड दमट बनले आहे. मुंबईत आजचे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
या पावसामुळे अंधेरी सब वेमध्ये 2 ते 3 फूट पाणी साचले असून, वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग बंद करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, रस्त्याच्या दोन्ही टोकांना बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. शिवाय, पाणी उपसण्यासाठी पंप आणि जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत.
ठाणे, नवी मुंबईतही पावसाची शक्यता कायम
रविवारी सायंकाळी ठाणे आणि नवी मुंबई भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. आज सकाळपासूनही ढगाळ वातावरण असून, काही भागांत रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने येथे देखील यलो अलर्ट लागू केला आहे. या भागांतील आजचे कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात थोडा खंड, पण उकाडा वाढण्याची शक्यता
पालघरमध्ये सकाळपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली असून, ढगाळ वातावरण आहे. हलक्याफुलक्या सरी झाल्या असल्या तरी मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. या जिल्ह्यात आजचे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दमट हवामानामुळे ग्रामीण भागात उकाड्याची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
कोकणात यलो अलर्ट कायम, मच्छिमारांना इशारा
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाचा मारा सुरू आहे. हवामान खात्याने या भागांसाठी आजही यलो अलर्ट जारी केला आहे. आकाश ढगांनी आच्छादलेले असून, जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागांत कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे. समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
