कोकण किनारपट्टीवर जोर कायम
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात मात्र अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर कोल्हापूरच्या घाट परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी व जालना जिल्ह्यांमध्ये वाऱ्याच्या झपाट्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव येथे हलक्याच पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट दिला आहे.
विदर्भात विजांसह पावसाचा इशारा
विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
जरी 27 जुलैपासून पावसाची तीव्रता काहीशी घटणार असली, तरी जोरदार सरी पडण्याची शक्यता अद्याप कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत सावध राहावं. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.