या संशोधनाचे नेतृत्व डॉ. रवींद्र पाटील यांनी केले. त्यांच्या पथकाने एआरआय-516 या उच्च उत्पादनक्षम द्राक्ष वाणावर सखोल अभ्यास करत बीजविरहित गुणधर्म कसा निर्माण होतो, याचा शोध घेतला. 2017 पासून सुरू असलेल्या या संशोधनासाठी जवळपास नऊ वर्षे प्रत्यक्ष शेतात प्रयोग करण्यात आले.
अभ्यासात असे स्पष्ट झाले की, बीजविरहित द्राक्षांमध्ये परागकणांची रचना असामान्य असते. त्यांची अंकुरणक्षमता अत्यंत कमी असून ते निष्क्रिय स्वरूपात आढळतात. या प्रक्रियेला परागकण वंध्यत्व असे म्हटले जाते. याशिवाय, मादी प्रजनन संरचना अपूर्ण विकसित आणि लहान असल्याने फलन प्रक्रिया प्रभावीपणे होत नाही. परिणामी, फलनाशिवाय फळ तयार होण्याची पार्थेनोकार्पी प्रक्रिया घडते आणि द्राक्षांमध्ये बिया तयार होत नाहीत.
advertisement
शास्त्रज्ञांनी आरएनए सिक्वेन्सिंग आणि जनुकीय विश्लेषणाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या जनुकांमधील बदल ओळखले. परागकण विकास, पेशी विभाजन आणि संप्रेरक नियंत्रणाशी संबंधित जनुकांची क्रिया कमी झाल्यामुळे बीज निर्मितीवर परिणाम होत असल्याचे निष्कर्ष समोर आले.
या संशोधनामुळे भविष्यात अधिक उत्पादनक्षम, उच्च दर्जाच्या आणि रोगप्रतिकारक द्राक्षांच्या नव्या जाती विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एआरआय-516 या वाणापासून विकसित करण्यात आलेले बीजविरहित उत्परिवर्तक (म्युटंट) शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असून, त्यामध्ये चांगली चव, अधिक उत्पादन आणि रोगप्रतिकारशक्ती अशी वैशिष्ट्ये आहेत.
जागतिक बाजारपेठेत सध्या पातळ साल आणि गोड चवीच्या बीजविरहित द्राक्षांना मोठी मागणी आहे. त्यामुळे या संशोधनामुळे भारतीय द्राक्ष निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे. तसेच वाईन उद्योग आणि प्रक्रिया उद्योगांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.
आघारकर संशोधन संस्थेचे संचालक प्रशांत ढाकेफळकर यांनी सांगितले की, या वाणामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि स्थिर उत्पन्न मिळू शकते. बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि टिकाऊ अशा द्राक्ष जाती विकसित करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे. एकूणच, बीजविरहित द्राक्षांचे जनुकीय गुपित उलगडल्यामुळे द्राक्ष उत्पादन क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणि संधी उपलब्ध होणार असून, शेतकरी, उद्योग आणि ग्राहक या तिन्ही घटकांना याचा थेट लाभ होणार आहे.





