पारंपरिक पिकांचा नाद सोडला
पारंपरिक पिकांऐवजी काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार करत पवार यांनी बाजारपेठेचा सखोल अभ्यास केला. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाणारी परवल भाजी स्थानिक बाजारात उपलब्ध नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. विशेषतः वाळूज एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांमुळे या भाजीची कायमस्वरूपी मागणी असल्याचं त्यांनी ओळखलं. याच संधीचं सोनं करत त्यांनी परवल शेतीचा प्रयोग सुरू केला.
advertisement
टँकरने पुरवलं पाणी
पाण्याची कमतरता हा मोठा अडथळा असतानाही त्यांनी हार मानली नाही. टँकरने पाणी आणून त्यांनी पिकांना पाणीपुरवठा केला आणि नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली. सुरुवातीला त्यांनी केवळ दहा गुंठ्यांत परवल लागवड करून प्रयोग केला. गुजरातमधून २५० ग्रॅम बियाणे तब्बल १० हजार रुपयांना खरेदी करून त्यांनी जोखीम घेतली. मात्र, पहिल्याच हंगामात चांगले उत्पादन आणि बाजारात ५० ते ६० रुपये प्रतिकिलो असा दर मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला.
यशस्वी प्रयोगानंतर त्यांनी परवल लागवडीचे क्षेत्र वाढवले. आज ते ६७ गुंठे क्षेत्रात विविध पिकांची लागवड करतात. परवलसोबतच वाल, भेंडी, टोमॅटो आणि करटुले अशी सात प्रकारची पिके त्यांनी प्रत्येकी पाच ते दहा गुंठ्यांत घेतली आहेत. सर्व पिकांची लागवड सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने केली जात असल्यामुळे उत्पादनाला बाजारात चांगली मागणी मिळते, तसेच उत्पादन खर्चातही बचत होते.
फक्त ५० हजार रुपये खर्च
परवल शेतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीच्या वर्षात सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, मात्र त्यानंतर पुढील दोन ते तीन वर्षे काढणीव्यतिरिक्त विशेष खर्च करावा लागत नाही. त्यामुळे या पिकातून शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा मिळू शकतो.
पुंडलिक पवार यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही नवी दिशा मिळाली आहे. अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देऊन मार्गदर्शन घेत आहेत. बाजारपेठेचा अचूक अभ्यास, नियोजन आणि नवीन प्रयोग करण्याची तयारी असेल, तर कमी पाण्यातही शेतीतून चांगला नफा मिळवता येतो, हे त्यांनी आपल्या उदाहरणातून सिद्ध करून दाखवले आहे.
