रायगड : कोकण विभागात २०२५मध्ये झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. रायगड जिल्ह्यासह कोकणातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची दखल घेत राज्य सरकारने नुकसानभरपाई निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कोकणातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असल्याने मिळणारी नुकसानभरपाई अत्यल्प आहे आणि ती वाढविण्याची गरज आहे.
advertisement
भात शेतीचे झालेले नुकसान
कोकणामध्ये मुख्यतः भात हे एकमेव प्रमुख पीक घेतले जाते. मात्र यावर्षी मे महिन्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले. जून ते ऑगस्टदरम्यान रायगड जिल्ह्यातच जवळपास ६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही, त्यांना मात्र नुकसानभरपाईपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने पेरणीखाली न आलेल्या पडीक जमिनींचादेखील विचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सरकारी निर्णय व मंजूर निधी
राज्य सरकारने कोकण विभागासह आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत १,८७५ शेतकऱ्यांसाठी एकूण ३७ लाख ४० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील ९८० शेतकऱ्यांसाठी ११ लाख ८१ हजार रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम ५५.६५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी वितरित केली जाणार आहे.
निधीचे वितरण कधी होणार?
ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत मंजूर निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.
दरम्यान, सरकारने जरी नुकसानभरपाई निधी मंजूर केला असला तरी कोकणातील शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता आणखी मदतीची गरज आहे. कारण लहान भूभागावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जाणारी रक्कम अत्यल्प आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यास त्यांना खरी दिलासा मिळेल आणि शेती पुन्हा उभी करण्यास मदत होईल.