15 कारखान्यांवर 372 कोटींच्या थकीत रकमेची वसुली
साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी महाराष्ट्रातील 15 साखर कारखान्यांकडून 372.61 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी आरआरसी कारवाईस मंजुरी दिली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 9 कारखाने असून त्यांच्यावर सुमारे 260 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
एफआरपी आणि आरआरसी म्हणजे काय?
ऊस (नियंत्रण) आदेश 1966 नुसार, साखर कारखान्यांनी ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे ऊसबिले अदा करणे बंधनकारक आहे.
advertisement
जर कारखान्यांनी नियोजित वेळेत पैसे दिले नाहीत, तर उशीर झालेल्या कालावधीत 15% व्याज आकारले जाते. तसेच, एफआरपी थकित राहिल्यास संबंधित कारखान्यांच्या थकीत रकमेची वसुली महसूल प्रशासनाद्वारे केली जाते आणि त्यासाठी आरआरसी आदेश दिले जातात.
थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांची यादी
मातोश्री लक्ष्मी, गोकूळ शुगर्स (धोत्री),लोकमंगल, बिबीदारफळ,लोकमंगल, भंडारकवठे जयहिंद शुगर, ,संत दामाजी सिद्धनाथ शुगर, इंद्रेश्वर शुगर,धाराशिव,सांगोला
शेतकऱ्यांना न्याय मिळेल का?
गेल्या काही महिन्यांपासून ऊस शेतकरी एफआरपीच्या पूर्ण रकमेच्या वसुलीसाठी लढा देत आहेत. अखेर साखर आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, काही कारखान्यांनी अजूनही थकबाकी चुकती केली नसल्यास, त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, साखर आयुक्तालयाने थकबाकी वसुलीसाठी प्रत्येक कारखान्यावर सतत लक्ष ठेवले आहे. जर संबंधित कारखान्यांनी ठरलेल्या मुदतीत पैसे न भरले, तर त्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.