पहिल्या टप्प्यात एक लाख कामगारांना लाभ
या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चार लाख नोंदणीकृत ऊसतोड कामगारांपैकी एक लाख कामगारांना मोफत शिधासंच दिला जाणार आहे. उर्वरित तीन लाख कामगारांना पुढील टप्प्यांत लाभ देण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सण-उत्सवाच्या काळात कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागाव्यात, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
advertisement
बीड जिल्ह्यातील कामगार सर्वाधिक
या योजनेत समाविष्ट लाभार्थ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. सुमारे २५ हजार लाभार्थी एकट्या बीड जिल्ह्यातून आहेत. ऊसतोड कामगारांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आणि कामाची अनिश्चितता लक्षात घेता, या जिल्ह्यासाठी हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
कोणत्या जिल्ह्यांचा समावेश
या शिधासंच वाटप योजनेत बीडसह नाशिक, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव, जालना, अहिल्यानगर आणि परभणी या दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांतील वितरणाची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे सोपवण्यात आली आहे. वितरण प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
शिधासंचात काय मिळणार?
मोफत देण्यात येणाऱ्या शिधासंचामध्ये रोजच्या वापरातील आवश्यक अन्नपदार्थांचा समावेश आहे. यात दोन किलो साखर, एक किलो खाद्यतेल, एक किलो चणा डाळ, एक किलो रवा, एक किलो मैदा आणि एक किलो पोहे यांचा समावेश असणार आहे. या शिधासंचाची अंदाजे किंमत सुमारे ६१० रुपये इतकी आहे. याशिवाय चार लाख लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस्तूंचा स्वतंत्र संच देण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.
