हवामानातील अनिश्चिततेमुळे पिकांचे योग्य वेळी नोंद घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन केल्यास ई-पीक पाहणी प्रक्रियेत अडचण येणार नाही.
ई-पीक पाहणी ॲप कसे काम करते?
कृषी विभागाने विकसित केलेल्या DCS V:4.0.0 मोबाईल ॲप द्वारे शेतकरी आपल्या पिकांची ऑनलाइन नोंद करू शकतात. शेतकरी ॲप डाउनलोड केल्यानंतर आधार क्रमांक व नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून लॉगिन करतो. त्यानंतर शेतकऱ्याने आपल्या नावावरील जमीन निवडून पीकाचा प्रकार, पेरणीची तारीख, क्षेत्रफळ, तसेच प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकाचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. नोंदणी सेव्ह केल्यानंतर ही माहिती थेट सातबारा उताऱ्यावर अपडेट होते.
advertisement
ॲपमध्ये अडचण आल्यास काय करावे?
काही शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये ॲप लॉगिननंतर पुढे जात नाही किंवा सतत buffering होते. अशा वेळी खालील उपाय करावेत जसे की, आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या E-Pik Pahani (DCS V:4.0.0) ॲपच्या आयकॉनवर क्लिक करा. उघडलेल्या पर्यायांमधून App Info हा पर्याय निवडा. त्यानंतर Storage and Cache या विभागात जा. येथे Clear Storage आणि Clear Cache हे दोन्ही पर्याय निवडून ॲपची जुनी माहिती साफ करा. आता ॲप पुन्हा ओपन करून लॉगिन व नोंदणीची प्रक्रिया सुरू करा.
या पद्धतीमुळे ॲपमधील अडथळे दूर होतात व नोंदणी प्रक्रिया अधिक जलद आणि सुरळीत पार पडते.
इंटरनेट कनेक्शनची काळजी घ्या
ई-पीक पाहणीसाठी शेतात गेल्यावर मोबाईलचे इंटरनेट कनेक्शन चांगले आहे याची खात्री करा. सुरुवातीला मिळणाऱ्या OTP साठी मजबूत इंटरनेट आवश्यक आहे. मात्र उर्वरित नोंदणी Offline Mode मध्ये करता येते. पूर्ण केलेली पीक पाहणी सेव्ह केल्यानंतर माहिती अपलोड करताना इंटरनेट आवश्यक असते.
शेतकऱ्यांसाठी सूचना
शेतात नोंदणी करताना मोबाईलची बॅटरी पुरेशी चार्ज असावी. ॲपचा नवीनतम आवृत्ती (latest version) वापरणे अधिक फायदेशीर ठरेल. शंका किंवा अडचणी आल्यास स्थानिक तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
दरम्यान, ई-पीक पाहणी ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना असून तिच्या मदतीने खरीप हंगामातील पिकांची अचूक व डिजिटल नोंद होते. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी ॲपमधील कॅचे क्लिअर करणे, चांगले इंटरनेट वापरणे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी थोडी काळजी घेतल्यास ई-पीक पाहणी प्रक्रिया वेगवान आणि सुरळीत पार पडून त्यांच्या शेतातील पिकांची योग्य नोंद सातबाऱ्यावर होते.