महागड्या भाज्यांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल
कृषी तज्ञांच्या मते, सतत चांगला दर देणाऱ्या पिकांची निवड केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अधिक मजबूत होते. यामुळेच अनेक शेतकरी आता कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणाऱ्या भाज्यांची लागवड करू लागले आहेत. या भाज्यांची मागणी केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशातही वाढत आहे. परिणामी, योग्य नियोजन आणि आधुनिक शेती पद्धती वापरून शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांचा नफा कमावू शकतात.
advertisement
शतावरी
शतावरी ही भारतातील सर्वात महागड्या भाज्यांपैकी एक मानली जाते. बाजारात तिचा दर साधारणतः १,२०० ते १,५०० रुपये प्रति किलोपर्यंत असतो. आरोग्याच्या दृष्टीने शतावरी अत्यंत उपयुक्त असून पचनसंस्था सुधारण्यास, प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि विविध आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. याच कारणामुळे परदेशी बाजारातही शतावरीची मोठी मागणी आहे. कमी कालावधीत चांगले उत्पादन आणि जास्त दर यामुळे ही भाजी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
बोक चॉय
बोक चॉय ही मूळची परदेशी भाजी असून भारतात तिची लागवड तुलनेने कमी प्रमाणात केली जाते. मात्र, अलीकडे काही प्रगत शेतकऱ्यांनी या भाजीची लागवड सुरू केली आहे. शहरांतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उच्चभ्रू ग्राहकांमध्ये बोक चॉयला मोठी मागणी आहे. बाजारात तिचा एकच देठ सुमारे ११५ रुपयांना विकला जातो. योग्य बाजारपेठ मिळाल्यास ही भाजी शेतकऱ्यांना चांगला नफा देऊ शकते.
चेरी टोमॅटो
चेरी टोमॅटो हे लहान आकाराचे पण पोषणमूल्यांनी समृद्ध असतात. तज्ञांकडून या टोमॅटोच्या सेवनाची वारंवार शिफारस केली जाते. सामान्य टोमॅटोपेक्षा त्यांची चव आणि पौष्टिकता अधिक असल्याने बाजारभावही जास्त असतो. सध्या चेरी टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. कमी खर्चात आणि कमी कालावधीत उत्पादन मिळत असल्याने ही लागवड शेतकऱ्यांसाठी आकर्षक ठरत आहे.
झुचीनी
झुचीनी ही भाजी आरोग्यदायी आणि चविष्ट असल्याने ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहे. वजन कमी करण्यासाठी आणि विशेष आहारासाठी झुचीनीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे तिची बाजारातील मागणी सातत्याने टिकून आहे. योग्य नियोजनाने लागवड केल्यास झुचीनी शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न देऊ शकते.
