२ लाखांपर्यंत होणार कर्जमाफी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली आहे. संकलित माहितीनुसार, कर्जमाफीच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.
२४ लाख ७३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार
राज्यात एकूण १ कोटी ३३ लाख शेतकरी असून त्यापैकी सुमारे २४ लाख ७३ हजार शेतकरी थकबाकीदार असल्याचे बँकर्स समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे एकूण ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे सोलापूर, पुणे,नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धारशिव, नांदेड आणि अहिल्यानगर यांसह सुमारे १४ जिल्ह्यांमध्ये थकबाकीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
३० सप्टेंबर २०२५ पर्यंतची थकबाकी ग्राह्य धरली जाणार
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, केवळ पीक कर्जच नव्हे तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जांचाही या कर्जमाफीत समावेश करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांचे पीक कर्ज नियमित असले तरी शेतीसाठी घेतलेले मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज थकीत आहे. अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दरम्यान, पीक कर्जाच्या परतफेडीची अंतिम मुदत साधारणतः ३० जूनपर्यंत असते. त्याआधीच कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
