माळरानावर फुलवला चंदनाचा मळा
अहिल्यानगर जिल्ह्यातील राजेंद्र रावसाहेब गाडेकर यांनी माळरानावर चंदनाची लागवड करून शेतीत नवे पर्व सुरू केले आहे. त्यांनी तब्बल २७ एकर क्षेत्रावर चंदनाची शेती करत कोट्यवधी रुपयांची उलाढाल साधली. फळबागांसोबत चंदनाची १४ हजार झाडे लावून त्यांनी एकात्मिक शेतीचा आदर्श निर्माण केला आहे.
लागवडीचा शास्त्रीय प्रयोग
२०१७-१८ या काळात गाडेकर यांनी तमिळनाडूतील मदुराई येथून पांढऱ्या चंदनाची रोपे आणली. दोन टप्प्यांत त्यांनी एकाच वर्षात २७ एकर क्षेत्रावर डाळिंब, संत्री, आवळा यांसह चंदनाची लागवड केली. नगर जिल्ह्यात अशा प्रकारचा प्रयोग करणारे ते पहिलेच शेतकरी ठरले. पिकांना नियमित आणि मोजके पाणी मिळावे यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था उभारण्यात आली. याशिवाय सामूहिक शेततळे योजनेतून ७५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधण्यात आले, तसेच दोन विहिरींचाही आधार घेतला. विशेष म्हणजे चंदनाला आठवड्याला केवळ चार लिटर पाणी पुरेसे ठरते.
advertisement
कमी खर्च, जास्त नफा
२७ एकरात लावलेल्या १४ हजार चंदनाच्या झाडांमधून गाडेकर यांना मोठा आर्थिक लाभ मिळत आहे. चंदनाच्या झाडापासून धूप, अगरबत्ती, तेल, पावडर अशी विविध उत्पादने तयार करून ते विक्री करतात. चंदनाच्या झाडाला साधारण तीन वर्षांत बिया येतात आणि या बियांना प्रतिकिलो ३०० ते ६०० रुपये दर मिळतो. चंदनाचे झाड स्वतः अन्न तयार करत नसल्याने शेजारी कडुलिंबासारखी झाडे असतील तर वाढीस फायदा होतो.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान
स्वतःला यश मिळाल्यानंतर गाडेकर यांनी केवळ स्वतःपुरते न थांबता परिसरातील सुमारे ४०० शेतकऱ्यांना चंदन शेतीकडे वळण्यासाठी मार्गदर्शन केले. लागवड, पाणी व्यवस्थापन, कायदेशीर बाबी याबाबत ते सातत्याने मदत करत आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात चंदन शेतीची चळवळ उभी राहत आहे.
चंदन शेती कायदेशीर आहे का?
चंदनाला ‘सोन्याएवढे मोल’ असल्याने अनेकांना त्याची लागवड बेकायदेशीर असल्याचा गैरसमज आहे. मात्र भारतासह महाराष्ट्रात चंदनाची लागवड पूर्णपणे कायदेशीर आहे. लागवडीसाठी कोणतीही पूर्वपरवानगी लागत नाही. मात्र लागवडीनंतर तलाठ्याकडे सातबाऱ्यावर नोंद करून वन विभागाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. महाराष्ट्र सरकारची ‘चंदन कन्या योजना’ देखील असून, त्यातून शेतकऱ्यांना १५ ते २० लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो.
