कोकण
शेतकऱ्यांनी भात, नाचणी, हळद, भुईमूग व फळपिके (नारळ, काजू, सुपारी, आंबा) यांतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. तसेच रायगड व पालघर जिल्ह्यांत प्रतिकूल हवामान असल्याने भाताची लागवड पुढे ढकलावी. खतांचा वापर व रासायनिक फवारणी पुढे ढकलाव्यात.
मध्य महाराष्ट्र
पुणे, नाशिक, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील घाट भागात भात पिकांतून पाणी काढण्याची योग्य व्यवस्था करावी. पुणे व नाशिकमध्ये भाताची पुनर्लागवड उघडीप पाहून करावी. सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या विश्रांतीनंतर मुग, उडीद, बाजरी, सोयाबीन पिकात आंतरमशागत करावी.
advertisement
मराठवाडा
सोयाबीन, बाजरी, हळद, ऊस, भाजीपाला व फळपिकांतून पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. रासायनिक फवारणी आणि खतांचा वापर सध्या टाळावा.
पूर्व विदर्भ
भात, फळबागा व भाजीपाला रोपवाटिकांतून अतिरिक्त पाणी बाहेर काढावे. भात रोपे, तूर, सोयाबीन व कापूस पिकात पुनर्लागवड, आंतरमशागत, खत व फवारणी पुढे ढकलावी.
पश्चिम विदर्भ
सोयाबीन, ज्वारी, मका, उडीद, तूर, मूग पिकांमध्ये वापसा स्थितीत आंतरमशागत करावी. तसेच नवीन लागवड केलेल्या फळबागांना काठीचा आधार द्यावा. वादळी वाऱ्यांपासून संरक्षणासाठी जनावरांना गोठ्यात ठेवावे.
मशागतीसाठी सल्ला
अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसाठी
भुईमुगात हुमणी अळी नियंत्रणासाठी मेटार्हिझियम अॅनिसोप्लिया @50 ग्रॅम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळिंब बागांतील रस शोषक किडींसाठी इमिडाक्लोप्रिड किंवा थायामेथोक्समची फवारणी उघडीप पाहून करावी.
कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांसाठी
भात, नाचणी पिकांतील अतिरिक्त पाणी बाहेर काढावे. भाजीपाला व फळबागांना काठीचा आधार द्यावा. मका, सोयाबीन, भुईमूग पिकांमध्ये आंतरमशागत करावी. आडसाली ऊस लागवडीसाठी पूर्वमशागत व रानबांधणी चालू ठेवावी.
दरम्यान, सध्याचे हवामान अनिश्चित असल्याने कोणतेही कृषी निर्णय घेताना हवामान विभाग व कृषी वैज्ञानिकांच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.