जालना : आपले कष्ट जर प्रामाणिक असतील तर खडकाळ शेत जमिनीमधून देखील सोनं पिकवता येतं हे सिद्ध करून दाखवले जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील खंडाळा या गावच्या एका शेतकऱ्याने. विलास शेषराव सोनवणे असं नाव असलेल्या या शेतकऱ्याने 16 एकर क्षेत्रावर बटाटे पिकाची लागवड केली होती. यामधून एकरी 100 क्विंटल उत्पन्न त्यांना झालं असून या बटाट्याला 15 ते 16 रुपये प्रति किलो याप्रमाणे भाव मिळाला आहे. 16 एकर शेतीमधून त्यांना 28 लाख उत्पन्न अपेक्षित असून आतापर्यंत त्यांनी 20 लाखांच्या बटाट्याची विक्री देखील केलीये. पाहुयात कसं केलं या प्रयोगशील शेतकऱ्याने बटाटा शेतीचे नियोजन.
advertisement
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील खंडाळा गावचे रहिवासी असलेले विलास सोनवणे हे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून काम करतात. त्याचबरोबर ते शेतीमध्ये देखील वेगवेगळे प्रयोग करत असतात. मिरची हे पीक ते मोठ्या प्रमाणावर घेतात. मिरची या पिकासाठी मध्यप्रदेश येथून कामगार आणले जातात. याच कामगारांच्या मुकादमाने त्यांना बटाटे शेतीची कल्पना दिली. लगेचच त्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर येथून 3000 रुपये प्रति क्विंटल या दराने पुखराज या वाणाची बटाटे बियाणे खरेदी केले. 16 एकरसाठी तब्बल 160 क्विंटल बियाणे लागवड केली. ट्रॅक्टरद्वारे बियाण्याची लागवड करण्यात आली.
शेतकऱ्याने लढवली शक्कल, 20 वर्षांपासून वापरतोय मोफत गॅस, काय केलं?
बटाटे पिकावर सुरुवातीच्या अवस्थेत येणाऱ्या करपा व शेवटच्या अवस्थेत येणारा करपा या दोन्ही करपा रोगाचे योग्य व्यवस्थापन केलं. शेतामध्ये बेसल डोस कीटकनाशकांचे योग्य व्यवस्थापन तसेच वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचे देखील ठिबकद्वारे व्यवस्थापन केलं. केवळ 70 दिवसांमध्येच हे पीक परिपक्व झालं. डबल 25 ते 30 महिला कामगारांच्या साह्याने या बटाट्यांची हार्वेस्टिंग सुरू आहे. हार्वेस्टिंगसाठी विशेष असं ट्रॅक्टर देखील त्यांनी मागवला आहे. दररोज 80 ते 90 क्विंटल बटाट्यांची संभाजीनगर, जळगाव, भोकरदन अशा विविध मार्केटमध्ये 15 ते 16 रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जात आहे. आतापर्यंत 20 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना या शेतीमधून झालं असून आणखीन 7 ते 8 लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
शेतकऱ्यांनी शेतामध्ये नवनवीन प्रयोग करावेत. पारंपरिक पिकांना फाटा देऊन वेगवेगळी नवी पिके घ्यावीत. कमी कालावधीच्या पिकांमध्ये अधिक नफा मिळत असल्याने अशी पिके निवडावीत व आधुनिक शेतीच्या माध्यमातून आपली प्रगती साध्य करावी, असं आवाहन विलास शेषराव सोनवणे यांनी शेतकऱ्यांना केले.