गणपतीला दुर्वा का वाहतात?
गणपतीला दुर्वा वाहण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. एकदा अनलासुर नावाच्या एका राक्षसाने प्रचंड दहशत, गोंधळ माजवला होता. तो लोकांना त्रास देत होता आणि सर्वत्र हाहाकार माजवला होता. त्याला आवर घालणे कोणत्याही देवासाठी शक्य नव्हते. तेव्हा सर्व देवांनी गणपतीला विनंती केली. गणपतीने त्या राक्षसाला जिवंत गिळून टाकले. अनलासुराला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड उष्णता निर्माण झाली आणि त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या. तेव्हा ऋषींनी गणपतीला दुर्वांची जुडी खाण्यास दिली. दुर्वांमध्ये शीतलता असते, ज्यामुळे गणपतीच्या पोटातील उष्णता शांत झाली आणि त्यांना आराम मिळाला.
advertisement
धार्मिक कारण: तेव्हापासून, गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय झाल्या आणि त्यांची पूजा करताना दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. दुर्वा पवित्रता, वाढ आणि शीतलता दर्शवतात. गणपतीला २१ दुर्वांची जुडी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
घरात बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी 10 वास्तु नियम समजून घ्या
गणपतीला तुळस का वाहत नाहीत?
गणपतीला तुळस न वाहण्यामागेही एक पौराणिक कथा सांगितली जाते. एकदा गणपती तपश्चर्या करत असताना तुळशीने त्यांना पाहिले. गणपतीचे रूप पाहून ती त्यांच्यावर मोहित झाली आणि तिने त्यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. पण, गणपतीने तुळशीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला. तेव्हा तुळशीला राग आला आणि तिने गणपतीला दोन विवाह होतील असा शाप दिला. यावर गणपतीनेही तुळशीला तुझा विवाह राक्षसाशी होईल, असा प्रतिशाप दिला.नंतर तुळशीला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने गणपतीकडे क्षमा मागितली, तेव्हा गणपतीने सांगितले की तुझी पूजा सर्व देवांना प्रिय असेल, पण माझ्या पूजेमध्ये तुझा वापर होणार नाही. याच कारणामुळे गणपतीच्या पूजेमध्ये तुळस वापरली जात नाही. तुळस इतर सर्व देवांना प्रिय असली, तरी गणपतीच्या पूजेसाठी ती वर्ज्य मानली जाते. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात, पण तुळस वाहिली जात नाही.
घरात पूजेसाठी गणेश मूर्ती खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)