29 वर्षांची मनी पवार नावाची महिला नुकतीच 27 लाख रुपये खर्च करून नवी कोरी महिंद्रा थार रॉक्स घेण्यासाठी शोरूममध्ये गेली होती. डिलिव्हरी घेण्याआधी शोरूमच्या पहिल्या मजल्यावर कारची पूजा करण्याचा निर्णय तिने घेतला. कारच्या चाकासमोर नेहमीप्रमाणे शुभ म्हणून लिंबू ठेवण्यात आला. पण या विधी दरम्यान मोठी दुर्घटना घडली.
पूजा संपल्यानंतर महिला हळूवारपणे कार पुढे हलवणार होती. मात्र चुकून तिने जास्त एक्सिलरेटर दाबला आणि गाडी अचानक वेगाने पुढे सरसावली. पाहता पाहता महिंद्राची ही दमदार एसयूव्ही शोरूमचे काच फोडून थेट पहिल्या मजल्यावरून खाली रस्त्यावर कोसळली. नवीन थार अक्षरशः चकनाचूर झाली.
advertisement
या अपघातात कारचे एअरबॅग्स वेळेत उघडल्याने मोठा अनर्थ टळला. मनी पवार आणि तिच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली, परंतु उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
पण आता या अपघातानंतर वेगवेगळे प्रश्न लोकांच्या मनात उद्भवले आहेत त्यापैकी महत्वाचा प्रश्न असा की आता खर्च कोण भरणार
भारतात जर कार घेताना तिचं रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल आणि गाडीचा अपघात झाला, तर तोटा भरण्याची जबाबदारी मुख्यतः शोरूम किंवा डीलरवर येते. कारण वाहनाचं अधिकृत मालकी हक्क (ओनरशिप ट्रान्सफर) ग्राहकाकडे जाईपर्यंत गाडी ही डीलरच्या ताब्यात मानली जाते.
भारतीय मोटार वाहन कायदा, 1988 नुसार, वाहनाचं रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स हे खरेदी पूर्ण झाल्यानंतरच प्रभावी होतं. त्यामुळे शोरूममधील अपघात हा डीलरची जबाबदारी मानला जातो. मात्र जर अपघात थेट ग्राहकाच्या बेपर्वाईमुळे झाला असेल (उदा. टेस्ट ड्राईव्ह किंवा चुकीच्या हाताळणीमुळे), तर ग्राहकावर भरपाईची जबाबदारी येऊ शकते. सामान्य प्रकरणांमध्ये डीलरकडील कमर्शियल इन्शुरन्स पॉलिसीमधून असा तोटा भरून काढला जातो.