अलीबाग तालुक्यातील घेरासागरगड वडवली येथे 2004 साली ही घटना घडली होती. मनोज पांडव याची बकरी गणेश ठाकूर यांच्या आवारात मृतावस्थेत आढळून आली होती. या घटनेबाबत प्रसाद ठाकूर यानेच बकरी मारल्याचा संशय मनोज पांडव याला होता. त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच वादातून मनोजने अलिबाग न्यायालयात प्रसाद ठाकूर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणामुळे त्यांच्यातील वैमनस्य अधिकच वाढत गेले.
advertisement
‘त्या’ अवयवाचे दोन भाग केले, 17 तास शस्त्रक्रिया अन्..., ‘मृत्यू’नं वाचवले दोन जीव!
या पार्श्वभूमीवर 2 एप्रिल 2004 रोजी रात्रीच्या सुमारास मनोज पांडव याने प्रसाद ठाकूर याला एकटे गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात प्रसाद ठाकूर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गणेश ठाकूर यांच्या फिर्यादीवरून पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी जयप्रकाश ऊर्फ जयेश म्हात्रे याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
मुख्य आरोपी मनोज पांडव हा गेली 21 वर्षे पोलिसांना चकवा देत फरार होता. पोयनाड पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त तपासाच्या आधारे त्याचा माग काढला. अखेर पनवेल येथील त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अटक केल्यानंतर मनोज पांडव याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोयनाडचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, हवालदार मंगेश लांगी, राकेश मेहतर आणि शिपाई किशोर चव्हाण यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.






