अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक वेरूळ लेणी परिसरात रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. खाजगी क्लासेसमधील 9 विद्यार्थी आपल्या शिक्षकासोबत सहलीसाठी वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेले होते. लेणीची सफर संपवून सर्वजण जोगेश्वरी कुंडाजवळ गेले असता अचानक अपघात घडला.
advertisement
विद्यार्थ्यांपैकी चेतन संजय पगडे (17) हा पाय घसरून थेट कुंडातील खोल पाण्यात पडला. विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी शिक्षक राजवर्धन अशोक वानखेडे (29) यांनी धाडसाने पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. या घटनेत दोघांनाही जीव गमवावा लागला.
नेमकं काय घडलं?
वेरूळ लेणी बघितल्यानंतर डोंगरावरील जोगेश्वरी कुंडाकडे गेले. कुंडाजवळ उभा असताना विद्यार्थी चेतन पगडे याचा पाय घसरून तो कुंडात पडला. चेतन कुंडात बुडत असल्याचं शिक्षक वानखेडे यांच्या लक्षात आलं. त्यांनी प्रसंगावधान दाखवत आपल्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी कुंडात उडी घेतली. मात्र पाण्यात बुडताना घाबरलेल्या चेतनने शिक्षकाला मिठी मारली. यामुळे दोघे पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे वेरूळ लेणी परिसरात शोककळा पसरली असून गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या अकाली मृत्यूमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजवर्धन वानखेडे हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. विद्यार्थ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांना प्राण गमवावे लागले. काळाने घातलेल्या झडपेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं आहे. या घटनेनंतर अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षितेबाबतच्या उपाययोजना आखण्याची मागणी करण्यात येत आहे.