विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव: कायद्याचे हात फार लांब असतात, कोणताही आरोपी सुटू शकत नाही, असे म्हटले जाते. याचाच दाखला जळगाव पोलिसांनी दिला आहे. सोनं चोरीच्या प्रकरणातील आरोपीला तब्बल 8 वर्षानंतर बेड्या घालण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशातून आरोपीला अटक करण्यात आली.
advertisement
शहरातील सराफा बाजारातून तब्बल आठ वर्षांपूर्वी 30 तोळे सोने घेऊन फरार झालेला बंगाली कारागीर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. जळगाव शहर पोलिसांनी सुशांत उर्फ सुनील कुंडू या आरोपीला वाराणसी, उत्तर प्रदेश येथून अटक केली असून, या कारवाईमुळे सराफा व्यावसायिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
>> नेमकी घटना काय?
2016 मध्ये जळगावमधील एका सराफा व्यापाऱ्याने दागिने तयार करण्यासाठी कारागीर सुशांत कुंडू याला 30 तोळे सोने (अंदाजे 350 ग्रॅम) दिले होते. मात्र सोने मिळताच आरोपी अचानक गायब झाला. कोणतीही माहिती न देता त्याने पळ काढल्यामुळे व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
> आठ वर्षांची शोध मोहीम
या प्रकरणानंतर आरोपीचा काहीच मागमूस लागला नव्हता. तरीदेखील जळगाव पोलिसांनी ही फाईल बंद न करता सतत तपास सुरू ठेवला. अलीकडेच पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी वाराणसीमध्ये खोटी ओळख वापरून दागिने तयार करण्याचेच काम करत आहे.
> वाराणसीत सापळा आणि अटक
ही माहिती मिळताच जळगाव पोलिसांचे पथक वाराणसीला रवाना झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या सुशांत कुंडूच्या ताब्यातून 100 ग्रॅम सोने (सुमारे 12 लाख रुपये किमतीचे) जप्त करण्यात आले. उर्वरित सोन्याबाबत चौकशी सुरू आहे. आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर जळगावला आणले जाणार आहे. सोन्याचा गैरव्यवहार, फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचे साथीदार किंवा इतर कोणाला सोने विकले गेले का, याची चौकशी केली जात आहे.