या प्रकरणातील पहिली घटना 21 जून 2025 रोजी घडली होती. त्यावेळी गावातील 11 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्या वेळी संशयाच्या आधारावर पोलिसांनी काही जणांची चौकशी केली होती, त्यात आरोपी अक्षय मांजरे याचाही समावेश होता. मात्र त्यावेळी ठोस पुरावे न मिळाल्यामुळे त्याला सोडून देण्यात आले होते. त्यामुळे हा गुन्हा काही काळ गूढच राहिला होता.
advertisement
शिक्षिकेनं दप्तर तपासलं, विद्यार्थ्यांच्या मनाला लागलं, थेट टोकाचं पाऊल, नवी मुंबईत खळबळ
पुढे 17 मार्च रोजी पुन्हा एकदा गावात तसाच धक्कादायक प्रकार घडला. 12 वर्षीय मुलगा सकाळी घरातून बाहेर पडला होता, परंतु संध्याकाळपर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली असता त्याचा मृतदेह उसाच्या शेतात विहिरीजवळ आढळून आला. मुलाच्या डोक्यावर गंभीर जखमा आणि अंगावर ओरखडे असल्याने हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना काही धागेदोरे मिळू लागले. तपासादरम्यान आरोपी अक्षय मांजरे हा वारंवार घटनास्थळी दिसत होता आणि गावकऱ्यांसोबत राहून पोलिसांना मदत करत असल्याचे भासवत होता. सुरुवातीला त्याच्यावर कोणालाही संशय आला नव्हता. मात्र पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्या जबाबात अनेक विसंगती आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर अखेर आरोपीने दोन्ही हत्या केल्याची कबुली दिली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही वेळा आरोपीने अल्पवयीन मुलांशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुलांनी विरोध केल्याने संतापाच्या भरात त्याने डोक्यात दगड मारून त्यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने गावात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू ठेवला आहे. या प्रकरणामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात असून संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.






