त्यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर टिळा आणि हात जोडून ते गणपतीच्या चरणी नतमस्तक होताना दिसतात. पुढे व्हिडीओमध्ये ते आनंदाने म्हणतात, “काय मग? यंदाचा आपला गणपती बाप्पाचा उत्सव जल्लोषात आहे ना? मग म्हणा… गणपती बाप्पा मोरया!”
पोस्टसोबतच त्यांनी प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंगही लिहिला, "आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥ हरी पाहिला रे, हरी पाहिला रे…" मिलिंद गवळी पुढे सांगतात, “बाप्पा विघ्नहर्ता आहे. भक्ताच्या आयुष्यातील संकटं दूर करून तो नवीन सुरुवात करण्याची ताकद देतो. या काळात अनेक जण दारू, मांसाहार सोडतात. हीसुद्धा एक सकारात्मक गोष्ट आहे. फक्त दूर्वा, जास्वंदाची फुलं, मोदक, अथर्वशीर्ष आणि आरत्या एवढं पुरेसं आहे बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी."
advertisement
त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली,“पूजा किती मोठी किंवा शास्त्रशुद्ध आहे हे महत्त्वाचं नाही. ती जर मनापासून केली तर बाप्पापर्यंत पोहोचतेच. माझी आई नेहमी म्हणायची, भोळे, साधे, अडाणी भक्त बाप्पाला लवकर पावतात. कारण त्यांची श्रद्धा निखळ असते." मिलिंद गवळींच्या या संदेशावर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये “गणपती बाप्पा मोरया!” असा जयघोष केला. काहींनी त्यांचा व्हिडीओ शेअर करून म्हटलं की, कलाकारांमधून मिळणारे असे सकारात्मक विचार खूप प्रेरणादायी असतात.