नवी दिल्ली: रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा चित्रपट आधीच यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. चित्रपटातील अनेक गोष्टींची चर्चा झाली ज्यामध्ये अक्षय खन्नाने साकारलेला रेहमान डकेतची भूमिका असो की अन्य व्यक्ती रेखा यामुळे धुरंधरची फक्त देशात नाही तर देशाबाहेर चर्चा झाली. पाकिस्तान आणि मध्यपूर्व आशियातील अनेक देशात या चित्रपटावर बंदी देखील घालण्यात आली. आता या चित्रपटावर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
advertisement
आज म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून धुरंधर चित्रपटाचे नवे व्हर्जन दिसणार आहे. आजपासून जे लोक हा चित्रपट पाहतील त्यांना एक गोष्ट पाहता येणार नाही. हा चित्रपट काही किरकोळ बदल आणि एडिट्ससह पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या बाबत एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B Ministry) चित्रपटातील “बलुच” (Baloch) हा शब्द म्यूट करण्याचे आदेश निर्मात्यांना दिले आहेत.
नवे आदेश काय आहेत?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील थिएटरना 31 डिसेंबर रोजी वितरकांकडून ई-मेल पाठवण्यात आला. त्या ई-मेलमध्ये सांगण्यात आले की चित्रपटाची डीसीपी (DCP) बदलण्यात येत आहे. यामागचे कारण म्हणजे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आलेल्या निर्देशांनुसार चित्रपटातील दोन शब्द म्यूट करण्यात आले असून एका संवादात बदल करण्यात आला आहे.
त्या सूत्राने पुढे असेही सांगितले की, सिनेमागृहांना नवीन कंटेंट डाउनलोड करून 1 जानेवारी 2026 पासून चित्रपटाची सुधारित आवृत्ती दाखवण्यास सांगण्यात आले आहे. ज्या दोन शब्दांना काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यापैकी एक शब्द “बलुच” आहे. दुसरा शब्द आणि बदललेला संवाद नेमका काय आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
‘धुरंधर’चा ट्रेलर 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित असून, रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटातील पात्रे नेमकी कोणावर आधारित आहेत, याबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. मात्र निर्मात्यांनी या पात्रांची अधिकृत ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. रणवीर सिंगचे पात्र मेजर मोहित शर्मा यांच्यापासून प्रेरित असल्याची चर्चा होती; पण सेन्सॉर बोर्डाने हे पात्र पूर्णपणे काल्पनिक असल्याचे स्पष्ट केले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या देशभक्तीवर आधारित चित्रपटानंतर ‘धुरंधर’च्या माध्यमातून देशप्रेमाची वेगळी बाजू समोर आणली होती. या चित्रपटात रणवीर सिंगसह अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि संजय दत्त हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
